बेळगाव : कृष्णा नदीवरील अलमट्टी जलाशयात पाण्याची आवक कायम असल्याने जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी (दि. १७) सायंकाळी सहापर्यंत जलाशयाची पातळी ५१९.५९ मीटर झाली असून जलाशय ९९.८० टक्के भरले आहे.
जलाशयाची कमाल पातळी ५१९.६० मीटर असल्याने पूर्ण क्षमतेपासून अवघे एक सें.मी. अंतर शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जलाशयात १२२.८३४ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. जलाशयाची कमाल साठवण क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे. जलाशयात ३३,७५० क्युसेक आवक होत असून सरासरी विसर्ग २४,००० क्युसेक आहे.
जलाशयाची पातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ आल्याने जलसंपदा अधिकाऱ्यांनी कृष्णा नदीकाठच्या विजापूर, बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे, लोकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अलमट्टी जलाशय लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.