बेळगाव : महाराष्ट्राच्या पश्चिम घाट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकाची जीवनवाहिनी मानले जाणारे अलमट्टी जलाशय पूर्ण भरण्याच्या टप्प्यात पोचले आहे. जलाशयात सध्या ८६.८८ टक्के पाणीसाठा झाला असून ८४,८११ क्युसेक पाणी दाखल होत आहे.
कृष्णा नदीतील पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे जलाशयाची पाणीपातळी वेगाने वाढत असून, यामुळे उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अलमट्टी जलाशयाची कमाल क्षमता ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ५१८.६२ मीटरपर्यंत पाणीसाठा झाला आहे.
सध्या ८४,८११ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून सुरक्षेचा उपाय म्हणून ६७,५०० क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह असाच राहिल्यास पुढील दोन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.