बेळगाव : अहिंद संघटना यापुढेही सक्रिय राहील आणि समाजाचा पाठिंबा मिळाल्यास नेतृत्व उदयास येत राहील. मुख्यमंत्री बदलले तरी सिद्धरामय्या हे आमचे नेतेच राहतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. ते रविवारी (दि. ७) गोकाकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळाल्याबद्दल समाधान असल्याची भावना मंत्री जारकीहोळी यांनी व्यक्त करून ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांत बांधकाम खात्यांतर्गत चांगली विकासकामे केली आहेत. जिल्ह्यातील विविध उड्डाणपूल प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यात असून काम शक्य तितक्या लवकर पूर्ण केले जाईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. ज्येष्ठ किंवा नवोदित आमदारांना मंत्रिपद द्यायचे की नाही, हा पूर्णपणे हायकमांडचा विषय आहे. बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने दुसऱ्या टप्प्यात आणखी एक मंत्रिपद मिळू शकते, असे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
केपीसीसी अध्यक्षपदातील संभाव्य बदलांबाबत विचारले असता, वन मॅन, वन पोस्ट धोरणाची अंमलबजावणी सुरू असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. अध्यक्षपद नसले तरी पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम सुरुच राहील, असेही मंत्री जारकिहोळींनी स्पष्ट केले.