बेळगाव ः रामायणात शबरी माता असलेले ठिकाण म्हणून ख्याती असलेल्या रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ्ळचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटींचा निधी जाहीर झाला आहे. त्यातून आता पुढील टप्प्यातील कामकाजावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
रामायणातील शबरीमातेचे वास्तव्य लाभलेले शबरीकोळ्ळ हे स्थळ आता धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. या स्थळाच्या विकासासाठी ‘आयकॉनिक टुरिझम’ योजनेंंतर्गत केंद्र सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
यासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राज्य पर्यटन खात्याला तातडीने उपाययोजना सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
शबरीकोळ्ळमध्ये सध्या प्राथमिक सुविधांचा अभाव असून रस्ते, पाणी, विजेची व्यवस्था, धार्मिक वास्तूंचे सुशोभीकरण आणि भक्तांसाठी निवासव्यवस्था यांची गरज आहे. आता मंजूर निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार, दोन तळ्यांची स्वच्छता, परिसरातील हरितावरण जतन, फोटोग्राफी पॉइंट्स, पार्किंग व्यवस्था, शौचालये आणि दिशा फलक आदी सुविधा उभारल्या जाणार आहेत.
या विकासामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात प्रथम टप्प्यातील कामांना सुरुवात होण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासन व पर्यटन विभागाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.