पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने सुमार कामगिरी केली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सातव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण बनला आहे. मात्र, या पराभवानंतर हार्दिकला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याच्याशिवाय मुंबईच्या इतर खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी एकना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला.
हार्दिकला या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी तो मुल्लानपूरमध्ये पंजाब किंग्जविरुद्धही दोषी आढळला होता. आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उर्वरित खेळाडूंना (इम्पॅक्ट प्लेअरसह) 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
लखनौविरूद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 144 धावा केल्या. इशान किशनने 36 चेंडूत 32 धावा, नेहल वढेराने 41 चेंडूत 46 धावा आणि टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुलने 22 चेंडूत 28 धावा केल्या. तर मार्कस स्टॉइनिसने 45 चेंडूत 62 धावा केल्या.
हेही वाचा :