नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बालिकांच्या शिक्षणाचा टक्का वाढावा, उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी दिल्लीतील मराठमोळे भाजप नेते आनंद रेखी यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) नोएडात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी २०० वातानुकूलित बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसमध्ये विद्यार्थीनींना नि:शुल्क प्रवास सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे, अशी माहिती रेखी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
यासंबंधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली . तसेच राज्य सरकार बससेवेसंबंधी लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,असा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशमधील नोएडात अशाप्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून त्याच्या यशस्वीतेवर इतरही शहरांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल, असे रेखी यांनी सांगितले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात नवनवीन प्रकल्प, सुविधा देशहितार्थ सुरू केली जात आहे. याच अनुषंगाने सर्वसामान्यांसाठी अत्यंत माफक दरात नोएडात या वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येतील. या बसेसमध्ये सर्वच वयोगटातील विद्यार्थींनींना नि:शुल्क प्रवासाची सुविधा दिली जाईल,असे रेखी म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी रेखी यांच्या कंपनीकडून यापूर्वी ५५ बसेस नोएडात धावत होत्या. कोरोना काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान याच बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरोघरी जेवण पोहचवण्याचे काम करण्यात आले होते. पंरतु, नोएडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून ही परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. ही बस सेवा पुर्ववत करण्यात आल्यास गोरबरीबांना त्याचा लाभ होवून त्यांच्या पैशांची बचत होईल. आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्था बाधित होवू नये याकरीता ही सेवा सुरळीत सुरू राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी देखील नोएडावासियांसाठी अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन एनएमआरसीकडून ही सेवा बंद करण्यात आली होती. नोएडात सार्वजनिक परिवहानाची प्रभावी व्यवस्था नसतांना बस सेवा बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसला. गेल्या तीन वर्षात चांगल्या पद्धतीने परिवहन संचालन केल्याने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीला मिळाले आहेत.पंरतु, असे असतानाही ही सेवा बंद केल्याची खंत रेखी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा