एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांकरिता महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. येथील आगाराचे कर्मचारी सच्छिदानंद पुरी हे सोमवारी (ता.१) पहाटे सहा वाजलेपासून झाडावर चढून गळ्याला फास लावून बसले होते. दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी रविवारी मध्यस्थी करत आंदोलकर्त्याची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्यास करण्यात आलेली शिष्टाई फेल ठरली आहे.
गेल्या चार दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृती समितीच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या समवेत केलेली चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची कृती समिती निर्णय घेणार कोण? कर्मचाऱ्यांना विश्वसात न घेतलेला निर्णय अमान्य असल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.
आमदार कैलास पाटील यांनी एसटीच्या कळंब आगारातील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन माहिती जाणून घेत एसटीच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होत एसटीची चाके फिरविली. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास कर्मचारी पुरी आगारातील झाडावर चढून गळ्याला फास लावून बसल्याने एकच गोंधळ उडाला.
आगारप्रमुख मुकेश कोमटवार, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, नायबतहसीलदार प्रथमेश भुरके, भाजपचे तालुका प्रमुख अजित पिंगळे, शहर प्रमुख संदीप बविकर, एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गळ्याला फास लावून बसलेले पुरी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पण एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करा, आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करू नये या मागण्यांवर ठाम असून मागण्याची पूर्तता केल्यानंतरच आपण झाडावरुन खाली उतरू. अन्यथा आत्महत्या करण्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे कर्मचारी पुरी यांनी सांगितले.
शेवटी तहसीलदार विद्या शिंदे यांनी आम्ही तुमचा प्रश्न शासन दरबारी लावून धरू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर पुरी खाली उतरले व सर्वानी सुटकेचा श्वास सोडला
मागच्या दोन दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने एसटी फिरू लागली होती. काही कर्मचाऱ्याच्या संघटनेत फूट पडल्याने गोंधळ उडाला आहे. येथील आगारातील बस विविध मार्गावर धावल्या होत्या, त्यामुळे एसटीची चाके सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी सुरू झालेल्या आंदोलनामुळे आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.