

ऑगस्ट क्रांतीनेे स्वातंत्र्याचा मंगल क्षणसमीप आणला. जगाच्या इतिहासावर विलक्षण ठसा उमटवणार्या बोल्शेविक क्रांती तसेच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती या घटनांप्रमाणेच ऑगस्ट क्रांतीलाही विशेष महत्त्व आहे. वसाहतवादी सत्तेला या क्रांतीने हादरे दिले. चले जाव चळवळीने इंग्रजांच्या शोषक प्रवृत्तीविरुद्ध जागतिक पातळीवर जागृती घडवून आणली. आज ऑगस्ट क्रांती दिनास
80 वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने…
आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती दिनास विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट क्रांती ही वसाहतवादविरोधी, वर्णवादविरोधी आणि भांडवलशाहीविरोधी क्रांती होती. भारतीय राष्ट्रवादास अद्भुत चेतना आणि प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आपणास ऑगस्ट क्रांतीमध्ये दिसून येते. ज्या दिवशी आपल्या हाती कोणतीही शस्त्रे नसताना महात्मा गांधी यांनी चले जाव, भारत छोडो अशा घोषणा केल्या आणि सबंध भारतातून इंग्रजांविरोधात असंतोषाची लाट निर्माण झाली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा इंग्रजी सत्तेला भारतीय जनआंदोलनातून जे जबरदस्त आव्हान देण्यात आले, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
14 जुलै 1942 रोजी बापू कुटीत भारत छोडो चळवळीचा ठराव झाला. या ठरावास 'वर्धा योजना' म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांना या चळवळीचे सर्वाधिकार दिले होते. मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात 'चले जाव' चळवळीचा ठराव मंजूर झाला. त्यानुसार 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानावर गांधीजींनी भाषण केले आणि त्यात 'डू ऑर डाय' हा महत्त्वाचा नारा दिला. 'यंग इंडिया' या साप्ताहिकातील लेखात गांधीजी म्हणतात, 'हा मोठा कसोटीचा क्षण आहे. ही अग्निपरीक्षा आहे. जनतेने चले जाव चळवळीचे भरभरून समर्थन करावे. आमचे अंधभक्त बनू नका. आमचे काही चुकत असेल तर आमच्यावर तुम्ही टीकाही करू शकता.'
पाशवी साम्राज्यसत्ता असलेल्या इंग्रजी सत्तेला मुळापासून हादरवून टाकणारा हा ठराव होता आणि त्याला गांधीजींचे नेतृत्व होते. या ठरावावर काँग्रेस महासभेत चर्चा झाली होती. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांंनी विरोध करत वेगळी भूमिका घेतली होती. स्वतः गांधीजींनी मुंबईतील भाषण करून पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये पोहोचताच त्यांना इंग्रजांनी अटक केली. काँग्रेसचे सर्व नेते भूमिगत झाले. अशा वेळी तडफदार युवा नेत्या अरुणा असफअली यांनी गवालिया टँँक म्हणजेच आझाद मैदानावर तिरंगा फडकवला आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन चळवळीस प्रारंभ झाला. संपूर्ण हिंदूस्थानात या चळवळीचे पडसाद उमटले. 9 लाख लोकांना अटक झाली आणि हे जनआंदोलन मोठ्या प्रमाणात सफल झाले. अनेक ठिकाणी लोकांनी सरकारी कार्यालयांवर, टेलिफोनच्या तारांवर हल्ले केले आणि मालमत्तेचे नुकसान केले. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने पुढे गांधीजींना इंग्रजांनी मुक्त केले; परंतु प्रमुख नेत्यांना चार-पाच वर्षे कारावास भोगावा लागला; पण इंग्रजांच्या सत्तेला जबरदस्त हादरा बसला होता.
इंग्रजांनी लढ्याच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नेत्यांची धरपकड केल्याने दुसर्या दिवशी अरुणा असफअली यांनी या चळवळीचे नेतृत्व केले. या चळवळीत लोकनायक जयप्रकाश नारायण, पंडित नेहरू, असीफ मेहता इत्यादी प्रमुख नेत्यांचे महत्त्व होते. चले जाव चळवळीचे मूल्यमापन करताना दयानंद विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. मलिक म्हणतात की, चले जाव चळवळीने अभूतपूर्व क्रांती केली. इंग्रजांना आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे याची खात्री पटली आणि भारताच्या स्वातंत्र्यास पोषक वातावरण तयार झाले. या चळवळीस तत्काळ फलश्रुती मिळाली नसली तरीही नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला.
1942 च्या लढ्यानंतर पुढे त्रिमंत्री योजना आली आणि लॉर्ड अॅटर्ली यांनी भारताच्या स्वातंत्र्यास अनुकूलता दर्शवली. म्हणजे 1942 चा लढा हा भारतीय स्वातंत्र्याची मंगल पहाट समीप आणण्याच्या दृष्टीने टाकलेले एक धाडसी पाऊल होते. या लोकलढ्याने भारतीय तरुणांमध्ये इंग्रजांविरोधात जबरदस्त जागृतीची वाट निर्माण केली. एस. एम. जोशी, अशोक मेहता, जयप्रकाश नारायण यांसारख्या नेत्यांचा उदय याच काळात झाला. पुढील 50 वर्षांच्या राजकारणावर आपल्या कार्यकर्तृत्वाने, विचाराने या नेत्यांनी ठसा उमटवला. तरुणांचे नवे नेतृत्व प्रदान करणारी चळवळ आणि नव्या युगाला सामोरे जाण्यासाठी जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारी चळवळ, असे या चळवळीचे वर्णन करता येईल.
जगाच्या इतिहासावर विलक्षण ठसा उमटवणार्या बोल्शेविक क्रांती तसेच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती या क्रांतिकारक घटनांप्रमाणेच ऑगस्ट क्रांतीलाही विशेष महत्त्व आहे. वसाहतवादी सत्तेला या क्रांतीने हादरे दिले. चले जाव चळवळीने इंग्रजांच्या शोषक प्रवृत्तीविरुद्ध जागतिक पातळीवर जागृती घडवून आणली. हिंदुस्थानसारख्या विशाल, खंडप्राय, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशावर राज्य करणे यापुढे कठीण आहे. हिंदुस्थानातील जनता आता जागृत झाली आहे, ती कुठल्याही क्षणी इंग्रजी सत्तेला सुरुंग लावू शकते हे लक्षात घेऊन आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे आणि हिंदुस्थानातील जनतेवर स्वातंत्र्य देऊन जबाबदारी टाकली पाहिजे, स्वतःच्या देशाचा कारभार चालवण्यासाठी ते समर्थ आहेत, अशी खात्री इंग्रजांना पटली. म्हणजे महात्मा गांधी यांनी वर्धा येथे ठराव करून बापू कुटीमध्ये घेतलेला चले जाव चळवळीचा क्रांतिकारक ठराव अशा प्रकारे मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर सफल झाला. त्यामुळे या मैदानाचे नाव पुढे आझाद क्रांती मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदान असे ठेवले. 9 ऑगस्ट 1942 भारतीय इतिहासाने एक तेजस्वी सुवर्णबिंब पाहिले आणि या सूर्याने स्वातंत्र्याचा मंगलक्षण समीप आणला, असेच आपणास या लढ्याचे वर्णन करता येईल.
आधुनिक भारताच्या विकासासाठी भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद इत्यादीपासून आपण मुक्त होण्याची गरज आहे. इंग्रजांना तर आपण हाकलून दिले; पण आता आपल्या व्यवस्थेत असलेले दोष आपण दूर केले पाहिजेत; जेणेकरून शोषणमुक्त कृषी-औद्योगिक समाज आपण निर्माण करू शकतो. स्वातंत्र्याचे स्वराज्य, सुराज्य आणि रामराज्यात रूपांतर करू शकणे हीच ऑगस्ट क्रांतीमध्ये बलिदान केलेल्या हुतात्म्यांसाठी खरी आदरांजली ठरेल.