मंगळयान मोहिमेतून भारताने ‘हे’ साधले...
नवी दिल्ली : मंगळयान मोहिमेने सुरुवातीपासूनच देदीप्यमान यश मिळवले होते. आता ही मोहीम संपुष्टात आली आहे; पण या मोहिमेतून अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. त्याबाबतची ही माहिती…
मंगळयान सहा महिन्यांसाठी पाठवण्यात आले होते; पण हे यान तब्बल आठ वर्षे आठ दिवस कार्यरत राहिले. या यानाने मंगळाचे एलिप्टिकल ऑर्बिट जॉमेट्रीपासून ते सर्वात जवळच्या बिंदूपर्यंत फोटो टिपले. याच ऑर्बिटमुळे ‘इस्रो’चे संशोधक मंगळाचा संपूर्ण डिस्क मॅप बनवू शकले. मंगळयानाने मंगळाचा चंद्र ‘डिमोस’चा सर्वात पहिला फोटो घेतला त्यावेळी तो मंगळ ग्रहाच्या अंडाकार कक्षेत सर्वात दूर प्रदक्षिणा घालत होता.
मंगळयानाच्या मार्स कलर कॅमेर्याने 1100 हून अधिक फोटो पृथ्वीवर पाठवले. त्याच्या मदतीने ‘इस्रो’ने मार्स अॅटलास तयार केला आहे. त्यामध्ये मंगळावरील विविध जागा पाहता येतात. मंगळयान आणि त्यावर 35 हून अधिक रिसर्च पेपर ‘पीअर रिव्ह्यूड जर्नल’ मध्ये प्रकाशित झाले आहेत. ही मोहीम केवळ 450 कोटी रुपयांमध्ये पार पडली. पहिल्याच प्रयत्नात आणि इतक्या कमी खर्चात मंगळमोहीम यशस्वी करून भारताने जगाला थक्क केले.
अमेरिका, रशिया आणि युरोपियन देश अनेक अपयशानंतरच मंगळावर पोहोचू शकले होते. मंगळयानाने या मोहिमेत सौरऊर्जेशी संबंधित सोलर डायनॅमिक्सचा अभ्यास केला. मंगळाच्या वातावरणातून संपूर्ण ग्रहावर आलेल्या धुळीच्या वादळांचाही अभ्यास केला. मंगळाच्या अॅक्सोस्फियरमध्ये हॉट ऑर्गनचा शोध घेतला. मंगळाच्या पृष्ठभागाच्या 270 किलोमीटर भागात किती प्रमाणात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड आहे हेही मंगळयानातील ‘मेन्का’ उपकरणाने सांगितले.