राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करा | पुढारी

राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा मुंबईतून गुजराती व राज्यस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 106 हुतात्म्यांचा अवमान करून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान होईल, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले असून त्याचा निषेध करण्यासाठी व त्यांची हकालपट्टी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातून राजभवनाला 1 लाख पत्रे पाठवण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महिबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आला.

त्यानुसार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, शहराध्यक्ष स्वप्निल जगताप यांनी कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करून 1 हजार पत्रे पाठवून देण्यात आली. राज्यपाल हे पद वरिष्ठ असून, त्या पदावर कार्यरत असणार्‍या व्यक्तीचा प्रत्येकाला आदर आहे. मात्र, सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करुन राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असून, ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत.

यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये करुन महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त करूनदेखील भाजप अशा वाचाळ कोश्यारी यांना पाठीशी घालत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. याचा निषेध करण्यासाठी व राज्यपाल कोश्यारी यांची पदावरुन हकालपट्टी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.यावेळी जिल्हा सचिव अतुल खरात, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button