पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,, दिवंगत आनंद दिघे यांच्या आशीर्वादामुळेच मी येथे उभा आहे.बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन ४० आमदार पुढे निघाले असून या आमदारांचे बंड म्हणजे एक ऐतिहासिक घटना होती. आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर चित्रपटातून अनेक गोष्टी दाखवू शकलो नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१०) पंढरपूर येथील मेळाव्यात सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले की, आमच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. आम्हाला वेगवेगळ्या उपमा देण्यात आल्या. मात्र, आम्ही त्यावर काहीएक बोललो नाही, आम्ही त्यांना कामातून उत्तर देणार आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून उत्तर देणार आहोत. आमची लढाई सोपी नव्हती, सुरूवातीला तीन रात्री एक मिनिटही झोपू शकलो नाही. माझ्या सोबतच्या आमदारांना मी विश्वास दिला की, तुमच्यावर आच येऊ देणार नाही. तुम्हाला कुठेही नुकसान पोहोचू देणार नाही. सर्व जबाबदारी मी घेईन, गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलण्यास तयार असल्याचा विश्वास आमदारांना दिला.
मला सत्ता पाहिजे म्हणून बंड केले नाही, आम्हाला बाळासाहेबांची भूमिका उघडपणे मांडता येत नव्हती. मागील अडीच वर्षात जो काही आम्हाला अनुभव आला. याबाबत मी सभागृहात कमी बोललो, वेळ आणली तर सर्व ऊहापोह करेन, मी कमी बोलतो, जास्त ऐकतो, जास्त काम करतो. मी कुणावर खालच्या पातळीवर टीका करत नाही. परंतु, आमच्यावर आपल्याच माणसांनी वार केले. ते अनेक वार आम्ही झेलले. मुंबईत ज्या दाऊदने बॉम्बस्फोट घडवून आणले त्याच्याशी संबंधित लोकांविरोधात आम्हाला बोलता येत नव्हते. बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली, त्या भूमिकेवर आम्हाला उघडपणे बोलता येत नव्हते, असे शिंदे म्हणाले.
पंढरपूर देवस्थानाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तिरूपतीच्या धर्तीवर विकास आरखडा तयार करून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला जाईल.
हेही वाचलंत का ?