पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. या विजयानंतर लगेचच बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. पहिल्या कसोटीतील उत्कृष्ट कामगिरी आणि एकतर्फी विजय लक्षात घेऊन बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्या सामन्यानंतर विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे झाले नाही.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजयासह क्लीन स्वीपकडे टीम इंडियाची नजर असेल. भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकला तर गुणतालिकेत त्यांचे स्थान आणखी मजबूत होईल. कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात अतिरिक्त फिरकी गोलंदाज घेऊन जाऊ शकतो. पहिल्या कसोटी सामन्यात फक्त आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल