कानपूर : भारत आणि बांगला देश (IND vs BAN 2nd Test Day 1) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील आज (दि.२७) पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय आला. खेळ थांबला तेव्हा बांगला देशची अवस्था ३ बाद १०७ धावा अशी होती. संततधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ स्थगित करण्यात आला आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. आज पावसामुळे टॉसला विलंब झाला होता. यामुळे सामना एक तास उशिरा म्हणजे १०.३० वाजता सुरु झाला होता.
आज भारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बांगला देशने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३५ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. ३५ षटके झाल्यानंतर अंधूक प्रकाश आणि पाऊस सुरु झाल्याने खेळ थांबण्यात आला. संपूर्ण मैदान प्लास्टिकच्या कव्हर्सनी झाकण्यात आले आहे.
भारताने नवव्या षटकात बांगला देशला पहिला धक्का दिला. आकाश दीपने झाकीर हसनला शुन्यावर झेलबाद केले. यशस्वी जैस्वालने स्लिपमध्ये हा उत्कृष्ट झेल पकडला. यामुळे १० षटकांत बांगला देशची अवस्था १ बाद २८ धावा अशी झाली.
१३ व्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर आकाश दीपने बांगला देशला दुसरा धक्का दिला. आकाशने बांगला देशचा सलामीवीर शादमान इस्लामला पायचीत केले. शादमान २४ धावा करून माघारी परतला.
पावसामुळे विलंब झाल्याने सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पहिले सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजता होईल. दुसरे सत्र दुपारी १.१० ते ३.१० आणि तिसरे सत्र ३.३० ते ५.३० दरम्यान होईल.
लंच ब्रेकपर्यंत बांगला देशने २६ षटकांत २ बाद ७४ धावा केल्या होत्या. नजमुल हुसैन शांतो २८ धावांवर आणि मोमिनुल हक १७ धावांवर खेळत होता.
लंच ब्रेकनंतर बांगला देशला अश्विनने तिसरा धक्का दिला. अश्विनच्या फिरकीने शांतो पायचित (Lbw) झाला. नजमूल शांतोने ३१ धावा केल्या. यामुळे ३५ षटकांत बांगला देशने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. ३५ षटकांनंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबण्यात आला.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने चेन्नईत २८० धावांनी दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे हा सामना जिंकून बांगला देशला 'व्हाईट वॉश' देण्याचा भारताचा इरादा आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची 'गदा' जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल मजबूत करण्याचा रोहित सेनेचा निर्धार असेल.
कानपूरचे ग्रीन पार्क मैदान हे जुन्या कसोटी स्थळांपैकी एक आहे. हे मैदान भारतासाठी तसे लकी आहे. भारताने आतापर्यंत या मैदानावर २३ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी ७ जिंकले आहेत, तर ३ गमावले आहेत. येथे १३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.