पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकला आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान आणखी मजबूत केले. भारतीय संघ सलग तिस-यांदा डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठेल का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रोहितसेनेचे अद्याप डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालेले नाही. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना आगामी सामन्यांमध्ये अजून मेहनत करावी लागणार आहे. भारताने आतापर्यंत सर्व जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे अंतिम सामने खेळले आहेत, परंतु सर्व फायनलमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागतील हे जाणून घेऊया.
भारत सध्या 71.67 पीसीटीसह पहिल्या स्थानावर आहे, परंतु तरीही WTC च्या या हंगामात एकूण 9 सामने खेळायचे आहेत. जे कोणत्याही संघाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. भारताला त्यांची टक्केवारी 60 च्या वर ठेवण्यासाठी आणखी 51 गुणांची गरज आहे. जे ते चार विजय आणि एक ड्रॉसह साध्य करू शकतात. जर पाच कसोटी जिंकल्यास विजयाची टक्केवारी 64.03 वर जाईल. पण सध्याची टक्केवारी काय ठेवण्यासाठी भारताला सात विजयांची आवश्यकता असेल. यावेळी संघाच्या विजयाची टक्केवारी सुमारे 70 च्या जवळपास राहिल. असे झाल्यास रोहितसेनेला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसे आहे. या संपूर्ण समीकरणामुळे भारतीय संघ इतर कोणत्याही संघाच्या निकालाची मदत न घेता अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
अगामी काळात भारतीय संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौ-यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कांगारू भूमीवरील ही मालिका सोपी होणार नाही. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघ अजूनही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौ-यापूर्वी भारतात खेळल्या जाणा-या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तीनही सामने रोहितसेनेला जिंकावे लागतील. तरच भारतीय संघाचा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठीचा मार्ग सुकर होईल.