कानपूर : बांगला देश संघ सध्या भारत दौर्यावर आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये पार पडला. आता 27 सप्टेंबरपासून दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्याला विरोध होत असून, त्यासाठी स्टेडियमच्या बाहेर होमहवन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या सामन्याला आंदोलकांचा धोका निर्माण झाल्याने कानपूरमधील सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे.
दुसर्या कसोटीला हिंदू महासभेकडून हा विरोध केला जात आहे. यापूर्वी हिंदू महासभेने आपली भूमिका स्पष्ट केली होती. हिंदू महासभेने सांगितले होते की, बांगला देशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे ज्या देशात हिंदू धर्मीयांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्याबरोबर भारताने क्रिकेटचे सामने खेळू नयेत, अशी आमची भूमिका आहे. आम्ही हा कसोटी सामना रद्द करण्याची मागणी केलेली आहे. जर हा सामना रद्द केला नाही, तर आम्ही आमच्या परीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारत आणि बांगला देशचा सामना ज्या कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे, या स्टेडियमच्या 10 क्रमांकाच्या गेटसमोर जो रस्ता आहे तिथे हे होमहवन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी 20 जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. कानपूरमधील एसीपी हरिश चंदर यांनी माहिती दिली आहे की, सोमवारी अखिल भारतीय हिंदू महासभाच्या 20 सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.