टी-20 विश्वचषक : इशान, अश्विन, शार्दुल खेळणार? | पुढारी

टी-20 विश्वचषक : इशान, अश्विन, शार्दुल खेळणार?

दुबई; वृत्तसंस्था : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली असून, संघनिवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या लढतीसाठी भारतीय संघामध्ये तीन बदल करून विराट झालेली चूक सुधारण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार यांना भारतीय संघात दिल्या गेलेल्या स्थानावर आणि आर. अश्विनला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गेल्या काही काळापासून गोलंदाजी करत नसलेल्या हार्दिक पंड्याला फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते. तर, भुवनेश्वर कुमारला गेल्या काही काळापासून गोलंदाजीची लय सापडलेली नाही. आयपीएलमध्येही तो फ्लॉप झाला होता.

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आता न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक बनले आहे. न्यूझीलंडविरुद्धची किरकोळ चूकही भारतीय संघाला महागात पडू शकते. भारतीय संघ निवड ही पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील पराभवाचे मोठे कारण ठरले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. यामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी इशान किशन याला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर, अनुभवी आर. अश्विन याला वरुण चक्रवर्तीच्या जागी संघात स्थान दिले जाऊ शकते. शिवाय भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे.

भुवनेश्वर कुमारला ‘आयपीएल – 2021’मध्ये लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. 11 सामन्यांत त्याला केवळ 6 बळीच मिळवता आले होते. पाकिस्तानविरुद्धही त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नव्हती. अशा परिस्थितीत त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळू शकते. गेल्या दोन वर्षांत 14 डावांत त्याने 23 विकेटस् घेतल्या आहेत. तर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती हा निष्प्रभ ठरला होता. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी त्यांची धुलाई केली होती. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी अश्विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

हार्दिक पंड्याच्या खांद्याची दुखापत गंभीर नाही

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला पाकिस्तान विरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात झालेली दुखापत गंभीर नसून, 31 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध होणार्‍या लढतीत तो उपलब्ध असण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गोलंदाजी न करणारा पंड्या आता फलंदाज म्हणून खेळत आहे. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत 8 चेंडूंत 11 धावा केल्या.

या सामन्यादरम्यान एक शॉर्ट पिच चेंडू त्याच्या खांद्यावर लागला. हार्दिक पंड्याचा स्कॅन रिपोर्ट आला असून, दुखापत गंभीर नाही. याशिवाय दोन सामन्यांत सहा दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरण्यास वेळ मिळेल; पण सरावादरम्यान त्याच्या स्थितीवर नजर ठेवण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे गरजेचे आहे.

Back to top button