वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने टीम इंडियात बदल केलाच ! शार्दुल ठाकूरला संधी
टी २० वर्ल्डकप सुरु होण्यास काही दिवसच शिल्लक असताना बीसीसीआयने भारतीय संघात बदल केला. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर संघात आला असून अक्षर पटेलला डच्चू मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियात काही बदल होणार आहेत असे वृत्त येत होते. बीसीसीआयने हे वृत्त खरे ठरवले, मात्र त्यात एक ट्विस्ट ठेवला.
माध्यमांमध्ये मुंबई इंडियन्सचा फ्लॉप गेलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघातून डच्चू मिळणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होते. मात्र बीसीसीआयने हार्दिकच्या संघातील स्थानाला हात न लावता अतिरिक्त फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या नावाला कात्री लावली. त्याच्या जागी अजून एक मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याचा समावेश केला.
हेही वाचा : टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार
शार्दुल ठाकूर हार्दिकचा बॅकअप प्लॅन
एकंदर बीसीसीआयच्या निर्णयावरून शार्दुल ठाकूर हा हार्दिक पांड्याचा बॅकअप प्लॅन असणार आहे. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धी पत्राकात शार्दुल ठाकूरला संघात घेतले असल्याचे सांगितले. याचबरोबर याच प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघाला मदत करण्यासाठी आठ खेळाडूंची निवड केल्याचेही सांगितले. यात आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमान मिरवाला, व्यंकटेश अय्यर, करण शर्मा, शाहबाज अहमद आणि के गौतम यांचा समावेश आहे.
यापूर्वी बीसीसीआयने ८ सप्टेंबरला टी २० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये अक्षर पटेलचे नाव संघात होते. तर शार्दुल ठाकूरचा समावेश स्टँड बायमध्ये होता. त्याच्या सोबत श्रेयस अय्यर दीपक चाहर यांचाही समावेश होता. आता शार्दुल ठाकूरला संघात समाविष्ट करण्यात आले आहे तर अक्षर पटेलला स्टँड बायमध्ये ठेवण्यात आले आहे.
विराट कोहली नंतर आरसीबीच्या कर्णधारपदासाठी ही नावे आहेत चर्चेत