वन डे मालिका विजयानंतर रोहित शर्मा जावून बसला धोनीच्या पंगतीत | पुढारी

वन डे मालिका विजयानंतर रोहित शर्मा जावून बसला धोनीच्या पंगतीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका धमाकेदार शैलीत जिंकली. या मालिकेत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. मँचेस्टर येथे १९८३ नंतर प्रथमच भारताला वन डे सामना जिंकता आला आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतने तुफान फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी जिंकून कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता रोहित शर्मा मोहम्मद अझरुद्दीन व महेंद्रसिंग धोनी यांच्या पंगतीत जावून बसला आहे.

रोहित शर्माने केला ‘हा’ विक्रम

रोहित शर्मा इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. मोहम्मद अझरुद्दीन व महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आता रोहित शर्मा हा इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. १९९० मध्ये अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकली आहे. रिषभ पंतचे खणखणीत शतक अन् हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीने भारताला २-१ अशी मालिका जिंकून दिली.

८ वर्षांनंतर जिंकली वन डे मालिका

भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० व वन डे अशा दोन्ही मालिका जिंकल्या आणि अशी कामगिरी अद्याप कोणत्याही भारतीय कर्णधाराला जमली नाही. ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली.

भारताची वनडे रँकिंगमधील तिस-या स्थानावर झेप

भारताने ऐतिहासिक मालिका जिंकून इंग्लंडलाचं नव्हे, तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही धक्का दिला आहे. भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकताना आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताने पाकिस्तानला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. न्यूझीलंड १२८ रेटिंगसह अव्वल आहे. तर इंग्लंड १२१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत १०९ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानकडे १०६ रेटिंग गुण आहेत. त्यामुळे तिसऱ्या स्थानावरची स्पर्धा पुढेही सुरू राहणार आहे.

२०२२ मधील इंग्लंडचा दौरा भारतासाठी यशस्वी

२०२२ मधील इंग्लंडचा हा दौरा भारतासाठी खूप यशस्वी ठरला. भारताने कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत अशी बरोबरीत सोडविली तर टी २० आणि वनडे मालिका २-१ ने जिंकली. भारताने त्याच्यांच भुमीत इंग्लंडला कोणत्याही फॉरमॅटमध्ये मालिका जिंकू दिली नाही. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम गोलंदाजी केली तर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगलेच धूवून काढले. इंग्लंडच्या गोलंदाजीच्या साऱ्या मर्यादा उघड करत राेहितने आपल्या शैलीतदार लईत षटकार आणि चौकारांची बरसात करत ५८ चेंडूत ७६ धावा केल्या. खूप दिवसांनी एकत्र खेळणाऱ्या रोहित शिखरच्या जोडीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी रचली.

Back to top button