भारताचा निम्मा संघ तंबूत
बर्मिंगहम : वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत पावसाने बाधित झालेल्या पहिल्या दिवशी भारताने शंभरीच्या आतच पाच विकेट गमावल्या होत्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा 5 बाद 98 अशी स्थिती झाली होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी शुक्रवारपासून एजबेस्टन येथे सुरू झाली. गेल्या वर्षी भारताने केलेल्या इंग्लंड दौर्यातील पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. तो शुक्रवारपासून सुरू झाला. त्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती. आता मालिका पराभव वाचवायचा असेल तर इंग्लंडला विजय गरजेचा आहे. सामना ड्रॉ जरी झाला तरी मालिका भारताच्या खिशात जाणार आहे.
कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने एजबेस्टन कसोटीसाठी चार वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याची रणनीती अवलंबली. रोहितच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलने डावाची सुरुवात केली. दोघांनी सावध खेळी करत पाच षटकांत 18 धावांवपर्यंत मजल मारली. जेम्स अँडरसनने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 17 धावा करणार्या शुभमन गिलला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले.
गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसनने भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणार्या चेतेश्वर पुजाराला 13 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. ढगाळ वातावरणाचा फायदा घेत जेम्स अँडरसनने वेगवान गोलंदाजी करीत भारतीय फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सातव्या चेंडूवर आपले खाते उघडले. मात्र त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पंचांनी उपाहाराची घोषणा केली.
पावसानंतर खेळ सुरू झाल्यानंतर मॅटी पॉटसने भारताला दोन धक्के दिलेे. त्याने 20 धावा करणार्या हनुमा विहारीला पायचित बाद केले. विहारीपाठोपाठ 11 धावा करणार्या विराट कोहलीला देखील बोल्ड करत भारताला पॉटसने चौथा धक्का दिला. या महत्त्वाच्या सामन्यात रोहित आणि राहुल यांच्या अनुपस्थितीत विराटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु तो या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर जेम्स अँडरसनने श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. अँडरसनची ही आतापर्यंतची तिसरी शिकार होती.