गाथा एका तपाच्या IPL ची | पुढारी

गाथा एका तपाच्या IPL ची

कोरोनाच्या जागतिक महामारीतही अनेक शक्यतांना मागे टाकत शनिवारपासून आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होत आहे. आयपीएलचा इतिहास पाहिला तर आयपीएलने या आपल्या एका तपाच्या इतिहासात अनेक चढ – उतार, वाद पाहिले आहेत पण, आजपर्यंतच्या इतिहासात आयपीएल रद्द करावी लागली आहे असे कधीही घडले नाही. कोरोनाने सर्व जगाला स्तब्ध केले पण, आयपीएलने या संकटातूनही मार्ग काढत आपला डंका वाजवला. आयपीएलने आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी कधीही फारकत घेतली नाही. 

आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात म्हणजे २००९ ला आपला देश सोडावा लागला. त्यावेळी आयपीएल आणि प्रेक्षकांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पण, थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आयपीएलने आपले प्रेक्षकांबरोबरचे लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन केले. यंदाच्या हंगामातही आयपीएलला आपल्या प्रेक्षकांचा विरह सहन करावा लागणार आहे पण, थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन केले जाईलच. या लाँग डिस्टन्स रिलेशनची एक व्यावसायिक गंमत आहे. हे लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन करण्यासाठी आयपीएललला एक दमडीही मोजावी लागत नाही. उलट याचे बक्कळ पैसे आयपीएलला मिळतात.   


असे हे आयपीएलचे आणि प्रेक्षकांचे नाते सुरु झाले ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी-२० स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयने नाके मुरडली होती. पण, महेंद्रसिंह धोनीच्या ज्यूनिअर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या संघाने बीसीसीआयला टी-२० प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयने आयपीएलला जन्माला घातले आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर जागतिक क्रिकेटलाही भुरळ घातली. आयपीएलचे आणि त्याच्या चाहत्यांच्या नात्याला एक तप पूर्ण झाले. यंदाच्या वर्षी त्याचा १३ वा हंगाम होणार आहे. पण, आयपीएल आणि त्यासोबत त्याच्या हक्काच्या प्रेक्षकांचा, चाहत्यांचा हा प्रवास फार रंजक आहे. यात वाद, विरह, पुन्हा जुळून येणाऱ्या रेशीम गाठी असा सगळा मसाला आहे. अनेक खेळाडूंचे आयुष्य घडले तर अनेक जण देशोधडीला लागले. असे हे आयपीएल रसायन आता भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहे. त्याचा हा एका तपाचा प्रवास…

धोनीच्या यंग ब्रिगेडमुळे बीसीसीआयची कोलांटी उडी

आयपीएलची सुरुवात ही भारताच्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या धोनीच्या युवा संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर झाली. नाहीतर बीसीसीआय पहिल्यापासूनच टी – 20 फॉरमॅटला नाके मुरडायची. त्यामुळेच त्यांनी टी – 20 वर्ल्डकपसाठी आपला दुय्यम संघ पाठवला. 

पण, या संघाने अंतिम सामन्यात सख्खा शेजारी पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानला पराभूत करुन पहिला टी-20 वर्ल्डकप भारतात आणला आणि बीसीसीआयलाच धक्का दिला. जसा हा वर्ल्डकप भारतात आला बीसीसीआयलाचेही टी-20 फॉरमॅटवर प्रेम जडले. त्यांनी भारतात या टी-20च्या लोकप्रियतेचे बाळसं धरलेल्या प्रेक्षक वर्गाला एनकॅश करण्याचा चंग बांधला. त्यानंतर फुटबॉल लीगच्या धरतीवर बीसीसीआयने आयपीएलची घोषणा केली. तसे पाहिले तर भारतात अशी लीग घेण्याचा हा पहिला प्रयत्न होता असे नाही. यापूर्वी आयसीएल इंडियन क्रिकेट लीग वर्षापूर्वीच म्हणजे 2007 ला सुरु झाली होती. ही लीग झी ने बीसीसीआयबरोबर प्रक्षेपणाच्या वादातून जन्माला घातली होती. 

त्यामुळे बीसीसीआयने या लीगला आपला पाठिंबा दिला नाही आणि याच्याशी जे लोक, खेळाडू जोडले जातील त्यांना बागी ठरवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. यातून खुद्द कपिल देव यांचीही सुटका झाली नाही. मग इतर ज्युनिअर खेळाडूंची काय गत होणार? पण, या लीगमध्ये भारतीय संघातील दिग्गज खेळाडू नसल्याने लोकांचाही त्याला पाठिंबा मिळाला नाही. त्यातच वर्षभरातच बीसीसीआयनेही आपली अधिकृत आयपीएल लीग जाहीर करुन आयसीएलची उरली सुरली हवा काढून घेतली.

मनोरंजनाचा बाप आयपीएल आलाय

आयपीएलची घोषणा झाली त्यावेळी जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळणार याची उस्तुकता सर्व क्रिकेट प्रेमींना होतीच. बीसीसीआयने आयपीएलचे प्रमोशन करतानाच ‘मनोरंजन का बाप’ असे केले. त्यामुळे आयपीएल ही फक्त टी – 20 स्पर्धा नाही तर ही एक मनोरंजनाची सिरीज आहे. गेली कित्येक दशके सास बहु मेलोड्रामा जीवनशैलीचा एक भाग बनलेल्या भारतीय जनमानसात आयपीएलने ग्रँड एन्ट्री केली. आयपीएलने या सास बहू वाल्यांचा हक्काचा प्राईम टाईम गिळंकृत केलाच पण, त्यांच्या हक्काच्या प्रेक्षकवर्गातही सेंध लावली. त्यामुळे भारतीय मनोरंजन बाजारच बदलून गेला. जसे आयपीएलने आपल्या सुरुवातीच्या हंगामाचे ‘मनोरंजन का बाप’ कॅम्पेन केले तसे जवळपास दोन आयपीएलने महिने सगळ्या कौटुंबिक मालिकांना आपला प्राईम टाईम बदलायला लावला. कारण आता प्राईम टाईम आयपीएल टाईम झाला होता.  

मनोरंजनाच्या क्षेत्रात पहिल्या हंगामाद्वारे दमदार एन्ट्री घेतल्यानंतर आयपीएलने आपला कॅम्पेनचा नूर बदलत जागतिक क्रिकेटमधील स्टार भारतीय कल्चरमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. या कॅम्पेनमुळे भारतीय क्रिकेट वेडे आता भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या संघातील खेळाडूंचेही चाहते बनू लागले. कॅरेबियन बेटावरील, कांगारुंच्या देशातील तगडे क्रिकेटर भारतीयच वाटू लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हळूहळू पोलार्ड मुंबईकर, ब्राव्हो चेन्नईतला साऊथ इंडियन, डेव्हिड वॉर्नर पक्का हैदराबादी बनला. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉन्टीनेतर त्याच्या मुलीचे नाव इंडियाच ठेवले. हा एक क्रिकेटमधील सकात्मक बदल होता. कारण आता भारतीय क्रिकेट वेडा चाहता चांगल्या क्रिकेटपटूच्या पर्यायाने चांगल्या क्रिकेटच्या प्रेमात पडू लागला होता. देशा देशातील सीमा अदृष्य झाल्या होत्या. 

बीसीसीआयने आयपीएलची रचना भारतीय प्रांतवार रचनेसारखी केली. त्यामुळे संपूर्ण भारत आयपीएलच्या कवेत आला. प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारा एक संघ आयपीएलमध्ये असल्याने प्रांतिक अस्मितेलाही हात घातला गेला. त्यामुळे आयपीएलचे भारतात यशाचे इक्वेशन चपखल बसले. 

आयपीएलमुळे ज्यूनिअर चेहऱ्यांवर पडला स्पॉटलाईट  

आयपीएलचा आणि भारतीय प्रेक्षकांचा सुरुवातीचा हा काळ तर हनिमून पीरियड होता. त्यामुळे ते आयपीएलचे दोन महिने क्रिकेट वेड्या भारताचे चांगलेच मनोरंजन होत होते. पण, आयपीएलने फक्त मनोरंजन केले नाही तर आयपीएलने देशांतर्गत खेळणाऱ्या अनेक गुणी खेळाडूंना आपली ओळख निर्माण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार करुन दिले. 

रणजी ट्रॉफीत चमकणारा एखादा ज्यूनिअर खेळाडू हा फक्त त्याच्या क्रिकेटिंग सर्कल, क्रिकेट जाणकारांच्याच नजरेत भरायचा. पण, आता आयपीएलमुळे तो सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत भरायला लागला. त्यामुळे त्याला भारतीय संघात न खेळताही स्टारडम अनुभवायला मिळायला लागले. आयपीएलने या ज्यूनिअर खेळाडूंना फक्त स्टारडम, पैसा चेहरा दिला नाही तर आयपीएलने त्यांच्यासाठी टीम इंडियाची दारे उघडून दिली. 


आता या खेळाडूंच्या निवडीसंदर्भातील चर्चा फक्त निवडसमितीच्या बंद दाराआड सीमित राहिला नाही ती आता न्यूज रुम भारतातील गल्लीतील कट्ट्यांवर, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पोहचली. याचा एक दबावगट तयार झाला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे भारतीय संघाला नव्या दमाची आणि बदलत्या क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवणारी पिढी मिळाली.

हे खेळाडू संघात निवडले जाण्यात त्यांच्या आयपीएलमधील कामगिरीचा मोलाचा वाटा आहे. याचे साधे उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने रणजी ट्रॉफीत किती विकेट घेतल्या किंवा तो रणजी ट्रॉफी कोणत्या संघाकडून खेळतो हे बऱ्याच लोकांना माहित नसेल. पण, त्याचा आयपीएलचा प्रवास आणि तेथून भारतीय संघात घेतलेली उडी ही कथा सामान्य प्रेक्षकालाही तोंडपाठ आहे. जसप्रीत बुमराह सारखे अनेक खेळाडू आहेत. बुमराह हा त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

अफगाणिस्तानच्या स्टारडमला आयपीएलचा पुश  

ज्याप्रमाणे भारतीय खेळाडूंना आयपीएलचा फायदा झाला त्याचप्रामाणे काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही आयपीएलचा फायदा झाला. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानची सध्याची लोकप्रियता. सध्याचा अफगाणिस्तानचा संघ हा त्यांच्या खेळामुळे आणि झुंजार वृत्तीमुळेच जागतिक क्रिकेटमध्ये उगवत्या ताऱ्याच्या रुपात दिसत आहे. पण, त्यांच्या लोकप्रियतेच्या वाट्यात आयपीएलचाही एक महत्वाचा वाटा आहे. कारण, अफगाणिस्तानचा संघ ज्या राशिद खान, मुजीब – उर – रहीम या दोन स्टार गोलंदाजांभोवती फिरतो त्या स्टार गोलंदाजांनी त्यांचे स्टारडम आयपीएलमधूनच कमावले आहे. या दोघांनाही कमी वयात आयपीएल खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांना जग ओळखू लागले. पर्यायाने अफगाणिस्तान क्रिकेटला जग ओळखू लागले. 

संदीप लामिछाने या नेपाळच्या युवा गोलंदाजाला आयपीएलमधून ओळख मिळाली. याचबरोबर संदीपमुळे सामान्य क्रिकेट चाहत्यांना नेपाळचाही क्रिकटचा संघ आहे याची कल्पना आली. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच देश क्रिकेट खेळतात असे म्हणणाऱ्यांच्या बौद्धिक मर्यादा विस्तारल्या. याला अप्रत्यक्षरित्या आपीएलही कारणीभूत ठरली. 

आयपीएल खेळातला पैसा आणि पैशाचा खेळ 


आयपीएलच्या सुरुवातीच्या काळातील लिलावात जगभरातील स्टार खेळाडूंना बक्कळ पैसा कमवून दिला. टी – 20 फॉरमॅटचा ढंगच फलंदाज धार्जिना असल्याने सुरुवातीला याचा फायदाही फक्त फलंदाजांनाच झाला. पण, जसजशी आयपीएलचे एका पाठोपोठ एक हंगाम येत गेले तस तसे गोलंदाजांचेही महत्व संघमालकांना पटू लागले. त्यामुळे संघ बांधणीसीठी रिसर्च होऊ लागला आणि आपल्या संघासाठी कोण योग्य कोणाला जास्त पैसे मोजून घेणे गरजेचे आहे याचा आराखडा तयार होत गेला. यामुळे गोलंदाज तसेच रिसर्च केल्यामुळे ज्यूनिअर खेळाडूंनाही जास्त पैसा मिळू लागला. याचे प्रतिबिंब आयपीएलच्या अनेक हंगामात दिसू लागेल. 

पण, याच खेळातल्या पैशाचे रुपांतर पैशाच्या खेळात कधी झाले याचा पत्ताच लागला नाही. या आयपीएलमधील पैशाच्या खेळाचे पहिले बिंग फुटले ते 2010 ला. आयपीएल ही फक्त ‘मनोरंजनाचा बाप’ नसून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे याची जाणीव आयपीएलचे फाऊंडर मेंबर आणि चेअरमन असलेल्या व्यापारी ललित मोदींनी कळून चुकले होते. त्यामुळे त्यांना अधिक नफा आणि अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी या कोंबडीवर एकाचवेळी जास्त अंडी घालण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी आयपीएलमध्ये नव्या दोन संघांचा समावेश करत त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी या प्रयत्नात आपलेही उखळ पांढरे करुन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. 


त्यांनी केरळ कोची टस्कर संघाची मालकी देण्याबाबत आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि आयपीएलमध्ये आर्थिक गडबडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे 2010 ला त्याचे निलंबन झाले. पण, त्यांच्या निलंबनाने आयपीएल मोठ्या वादात अडकली. कारण, आयपीएल संघात काळा पैसा मुरवला जातो, हवालाच्या पैशाचा वापर होतो असा आरोप होऊ लागला. 

आयपीएलचा हनिमून पिरियड संपला 


2010 ला हा मोठा आयपीएलचा वाद समोर आल्यानंतर आयपीएलचा गुडी गुडी असा वाटणारा हनिमून पिरियड संपला. या वादानंतर आयपीएलकडे त्याच्या आर्थिक गणितांकडे साशंकतेने पाहिले जाऊ लागले. आयपीएलचा मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींनी या प्रकरणामुळे लंडनला पळ काढावा लागला. आता आयपीएल भारतातील मोठ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आली होती. आता जनसामानसातच आयपीएल हा तर बीसीसीआयचा पैशाचा खेळ आहे अशी धारणा होऊ लागली. त्यामुळे त्यांना खेळाच्या नावाखाली आर्थिक सवलती देण्यास विरोध होऊ लागला. 

यातच 2012 ला स्पॉट फिक्सिंग एक प्रकरण घडले. पण, या प्रकरणाने आयपीएलकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत गेला. कारण भारतीय क्रिकेटला 2000 च्या दरम्यान मोठा दणका दिला होता. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. यात गुंतलेले खेळाडू हे मोठे खेळाडू नसल्याने जरी या प्रकरणाला जास्त हवा मिळाली नसली तरी चाहत्यांच्या मनात फिक्सिंगची पाल चुकचुकली होतीच. त्यातच खेळाडूंच्या नाईट पार्ट्या, चिअर लिडर्स, अभिनेत्र्यांचा ग्लॅमरस सहवास याच्या सुरस कथा बाहेर येत होत्या. 

अखेर 2013 ला आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचा बॉम्ब फुटलाच. यामध्ये ज्या तीन खेळाडूंची नावे आली त्यात भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू एस. श्रीसंतचे नाव आल्याने याप्रकरणाला मोठी हवा मिळाली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारावाईने पुढे आयपीएलमधील सट्टाबाजाराचे पितळ उघडे पाडले. या सट्टेबाजी प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये मोठ्या पदावर असलेल्या आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचा जावई गुरुनाख मयप्पन याला अटक झाली. त्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा यांचेही नाव या प्रकरणात झळकले. 

बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयाच्या रडावर 

सट्टेबाजी प्रकरणात मोठी मोठी नावे आल्याने आणि बीसीसीआयच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या नातेवाईकालाच अटक झाल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले. त्याचा परिपाक म्हणून 2014 ला बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने एवढ्यावरच न थांबता बीसीसीआयच्या शुद्धीकरणाची मोहीमच हातात घेतली. त्यांनी पहिल्यांदा सट्टेबाजीत सामिल असणाऱ्या दोन संघ मालकांच्या संघांवरच बंदी घातली. दोन वेळीचे विजेती चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिला हंगाम गाजवणारा राजस्थान रॉयल्स दोन्ही संघांवर दोन वर्षाची बंदी आली. 

यानंतर बीसीसीआयचे शुद्धीकरण करण्यासाठी लोधा समितीची नियुक्त करण्यात आली. या समितीने बीसीसीआयचा चांगलचा कीस काढला. याचा फटका बऱ्याच मोठ्या मोठ्या खेळाडूंना बसला. लाभाच्या पदाचा मुद्दा घेऊन त्यांचे आर्थिक हितसंबध तपासण्यास सुरुवात केली. यातून ना तेंडुलकर, द्रविड सुटला ना धोनी सुटला. हा बीसीसीआयचा आणि पर्यायाने आयपीएलचा रफ पॅच दोन वर्ष चालला. 

आयपीएलशी प्रेक्षकांचा कोडीमोड नाहीच 

पण, या दोन वर्षात बीसीसीआय आणि आयपीएलमध्ये अमुलाग्र बदल झाले, अनेक बंधने आली. दोन संघ बंदीमुळे बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी दोन संघांची नव्याने निर्मिती करण्यात आली. गुजरात लायन्स आणि रायजिंग पुणे जायंट या दोन संघात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना सामावून घेण्यात आले. पण, प्रेक्षकांना धोनीला निळ्या जर्सीत आणि स्मिथ, रहाणेला निळ्या जर्सीत बघण्याची सवय झाली होती. त्यामुळे हा बदल फारसा रुचला नाही. 

अखेर दोन वर्षे सरली. चाहत्यांच्या स्मृतीपटलावरील आयपीएल सट्टेबाजीच्या, फिक्सिंगच्या स्मृतीही अंधूक झाल्या. चाहत्यांनी या दोन्ही संघाचे विशेषतः धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे खुल्या मनाने आणि जल्लोषात स्वागत के

Back to top button