रोहितने सांगितले ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्याचे कारण! | पुढारी

रोहितने सांगितले ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्याचे कारण!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. यात हिटमॅन रोहित शर्माला वगळल्याने क्रिकेट जगतातून नाराजीचा सुरू उमटू लागला. दरम्यान, रोहित शर्माने मौन सोडत निवड न करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान रोहित शर्माचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो काही सामन्यात खेळलाही नव्हता. त्यादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती. त्यामध्ये दुखापतीचे कारण देत रोहित शर्माला वगळण्यात आले. यावर रोहित शर्माने स्पष्टीकरण दिले आहे. 

वाचा: टीम इंडियात संधी न मिळालेल्या सुर्यकुमारनं सोडलं मौन, म्हणाला…

माझी दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती, याची मला खात्री होती. परंतु माझ्या निवडीबाबत काय घडले, याबाबत मी अनभिज्ञ आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ११ दिवसांत सहा मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यामुळेच मी हे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मी फिट होण्यासाठी साडेतीन आठवडय़ांचा कालावधी हवा होता. जर मी दुखापत सावरण्यास वेळ दिला, तर कदाचित कसोटी सामने खेळू शकेन, अशी आशा होती. मी घेतलेला हा साधा निर्णय इतका गुंतागुंतीचा का झाला, हे मलाही कळले नाही. अशी भावना रोहितने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. 

वाचा: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना होणार रद्द?

तसेच, आयपीएलमधील बाद फेरीमध्ये खेळण्याच्या निर्णयाबाबत रोहित म्हणाला, दुखापत झाल्यानंतर पुढील दोन दिवस मी त्यानंतरचे १० दिवस काय करायचे, ही योजना आखली. मी ‘आयपीएल’च्या पुढील सामन्यांत खेळावे की खेळू नये, हे ठरवले. ऑस्ट्रेलियात खेळण्याविषयी कोण काय बोलते, हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. 

परंतु येत्या काही दिवसांत मी ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी सज्ज होईन, अशी आशा रोहितने व्यक्त केली. सध्या रोहित बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत पुनरागमनाची तयारी करत असल्याचेही रोहितने सांगितले आहे. 

Back to top button