टीम इंडियात संधी न मिळालेल्या सुर्यकुमारनं सोडलं मौन, म्हणाला… | पुढारी

टीम इंडियात संधी न मिळालेल्या सुर्यकुमारनं सोडलं मौन, म्हणाला...

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ ३ वन डे, ३ टी२०  आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. IPL2020 सुरू असतानाच BCCIने या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. मात्र, मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणा-या सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौ-याच्या संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे अनेकांकडून निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. पण सूर्यकुमारनं या संदर्भात काहीही टीप्पणी केली नव्हती. मात्र, एका मुलाखतीदरम्यानं त्यानं आपल्याला टीम इंडियात स्थान न मिळाल्याच्या मुद्यावरून अखेर मौन सोडलंय.

सुर्यकुमार म्हणतो की, ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी टीम इंडियामध्ये मला स्थान मिळेल अशी माझी अपेक्षा होती. पण संघ जाहीर झाल्या तेव्हा मला संघात स्थान मिळालं नसल्याच समजलं. या नंतर मी खुपच उदास झालो. संघात स्थान न मिळाल्याची भावना माझ्या मनातून जात नव्हती. त्यामुळं माझं सरावात मन लागत नव्हतं. मी उदास झाल्याचं पाहून रोहित शर्माने माझी विचारणा केली. संघातून वगळल्याबद्दल तुला वाईट वाटतंय का? असं त्यानं मल प्रश्न केला. त्यावर मी माझ्या मनातली खरी भावना बोलून दाखवली. पण, असो जे झालं ते झालं. आता मी पुन्हा एकदा संधीची वाट पाहतोय. 

IPL 2020 चं विजेतेपद पटकावणा-या मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला मजबुती दिली ती सूर्यकुमार यादवनं. या स्पर्धेत त्यानं आपल्या शैलीनं सर्वांनाच प्रभावित केलं. सूर्यानं १६ सामन्यांतील १५ इनिंग्जमध्ये ४ अर्धशतके तर ठोकलीच पण त्याच बरोबर त्यानं १४५ च्या स्ट्राईक रेटनं ४८० धावाही फटकावल्यात. आता इतकं चांगल प्रदर्शन करूनही जर टीम इंडियाच्या संघाची दारं आपल्या खुली होत नसतील तर त्या खेळाडूला उदास वाटणं हे सहाजिकच आहे. पण तरीही नाराज न होता सुर्यकुमार यादवनं माझी क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे, अशी संयमी प्रतिक्रिया दिलीय. 

सुर्यकुमार पुढे म्हणाला की, माझी क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे. त्या वेळेचा सदुपयोग करून मी संघात स्थान मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करेन. २०२१ मधील IPL आणि देशांतर्गत स्पर्धेत मी नक्कीच चांगलं प्रदर्शन करून निवड समितीचं लक्ष वेधून घेईन. 

सुर्यकुमारचा हा आत्मविश्वास खरंच खुप कौतुकास्पद आहे. आता त्याचं पुढचं लक्ष्य हे टी २० विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान मिळवणं हे आहे. त्यासाठी त्यानं आतापासूनच कंबर कसली असून त्यानं जोरदार तयारीला सुरुवात केलीय. 

 

Back to top button