अजिंक्य रहाणेची धोनीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी!
मेलबर्न : पुढारी ऑनलाईन
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला आठ विकेटने पराभूत केले. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. तसेच शतकी खेळी साकारून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणा-या कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नावावर एक खास विक्रमाची नोंद झाली आहे. रहाणेने तीन कसोटी सामन्यांत भारताच्या संघाचे नेतृत्व केले असून तिन्ही कसोटी सामने जिंकले आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली असून विराट कोहलीला मागे टाकले आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावे होता. कर्णधार म्हणून पहिल्या तीन सामन्यातही धोनीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.
अजिंक्य रहाणेचे रेकॉर्ड…
विरुद्ध संघ | निकाल | मैदान/वर्ष |
ऑस्ट्रेलिया | भारताचा ८ विकेट राखून विजय | धर्मशाळा, २०१६/१७ |
अफगानिस्तान | २६२ आणि डावाने विजय | बंगळूर, २०१८ |
ऑस्ट्रेलिया | भारताचा ८ विकेट राखून विजय | मेलबर्न, २०२०/२१ |
महेंद्रसिंह धोनीचे रेकॉर्ड…
विरुद्ध संघ | निकाल | मैदान/वर्ष |
दक्षिण आफ्रिका | भारताचा ८ विकेट राखून विजय | कानपूर, २००८ |
ऑस्ट्रेलिया | भारत १७२ धावांनी विजयी | नागपूर, २००८ |
इंग्लंड | भारताचा ६ विकेट राखून विजय | चेन्नई, २००८ |
विराट कोहलीचे रेकॉर्ड…
विरुद्ध संघ | निकाल | मैदान/वर्ष |
ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी विजय | ॲडलेड, २०१४/१५ |
ऑस्ट्रेलिया | सामना अनिर्नित | सीडनी, २०१४/१५ |
बांगला देश | सामना अनिर्नित | चेन्नई, २०१५ |
गेल्या ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा कोणताही फलंदाज अर्धशतक करू शकलेला नाही…
ऑस्ट्रेलियन संघाने घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून तब्बल नऊ वर्षांनी सामना गमावला. याआधी २०११/१२ मध्ये होबर्टमध्ये न्यूझीलंडने कांगारू संघाचा सात धावांनी पराभव केला होता. भारताविरुद्धच्या या सामन्यात दोन्ही डावांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कोणताही फलंदाज अर्धशतक फटकावू शकलेला नाही. असं ३२ वर्षानंतर घडलं आहे. यापूर्वी १९८८-८९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही डावांमध्ये अर्धशतक करता आले नव्हते. हा सामनाही मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता.
परदेशात सर्वाधिक कसोटी सामने भारताने फक्त MCG मध्ये जिंकले….
१० वर्षांनंतर टीम इंडियाने परदेशी मैदानावर प्रथम गोलंदाजी करुन विजय मिळविला. या आधी २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे भारताने पहिले गोलंदाजी केली करत सामना जिंकला होता. मेलबर्न क्रिकेट मैदानावर आतापर्यंत भारताने परदेशी भूमीवरील सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने एमसीजी येथे १४ कसोटी सामन्यातील ४ सामन्यांय विजय मिळवला आहे. त्याशिवाय वेस्ट इंडिजच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर टीम इंडियाने १३ कसोटी सामन्यांमधील तीन कसोटी सामने जिंकले आहेत.