IND vs ENG : प्रेक्षकांविना पार पडणार उर्वरित टी -२० सामने
अहमदाबाद: पुढारी ऑनलाईन
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता गुजरात क्रिकेट मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून, तीन सामने होणार आहेत. दरम्यान, गुजरात क्रिकेट मंडळाने उर्वरित सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामने होत असून, दोन सामने झाले आहेत. तर तीन सामने होणार आहेत. १६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी उर्वरित तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली होती.
मात्र, पुन्हा एकदा करोना संक्रमण वाढल्याने प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रेक्षकांनी सामन्याची तिकीट घेतलेली आहेत. त्यांना पैसे परत करण्यात येतील, असे गुजरात क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.
गुजरातमध्ये करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर टाकली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ९०० नवी करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यांप्रमाणेच गुजरात सरकारनेही करोना रुग्णांची संख्या वाढत असलेल्या ८ भागांमध्ये काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. विशेषतः रेस्तराँ, भोजनालये रात्री दहानंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.