जळगाव: खरीप हंगामासाठी सरासरी ५० टक्के पीक कर्ज वाटप
जळगाव; पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या खरीप हंगामात शासनातर्फे देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी सरासरी ४९.४४ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले. यात राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी, प्रादेशिक ग्रामीण बँकापैकी जिल्हा बँक अग्रेसर असून आतापर्यत १लाख २७ हजारांहून अधिक शेतकर्यांना ५०० कोटी १० लाख सरासरी ८४ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याचे सहकार विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
वाचा : पंकजा मुंडे काल घरातच आहे म्हणून सांगणाऱ्या अजूनही शांतच! देवेंद्र फडणवीसांचा पारा का चढला?
यावर्षी कोरोना संसर्ग प्रादूर्भावामुळे अडचणीत आलेल्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनपातळीवरून खरीप व रब्बी हंगामासाठी २२०० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. मार्च अखेर सुमारे दीड लाखांच्यावर शेतकर्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे. आतापर्यत १ लाख ४३ हजार ७४५ शेतकर्यांना ७९८ कोटी ६ लाख १८ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.
वाचा : पाऊस पडावा म्हणून सप्तशृंगी देवी ला घातलं साकडं
राष्ट्रीयकृत बँकांनी १ हजार ९२ कोटी ६० लाख २७ हजार उदिष्टापैकी फक्त १३ हजार ३६८ शेतकर्यांना २२२ कोटी ३४ लाख ८ हजार रूपये (२९.०९ टक्के) तसेच खासगी बँकांनी २७५९ शेतकर्यांना ६८ कोटी २३ लाख ५१ हजार (२९.३९ टक्के) आणि प्रादेशिक ग्रामीण बॅंकांकडून ७९८ शेतकर्यांना ९ कोटी १६ लाख ५९ हजार (५०.६३ टक्के) असे एकूण ७९८ कोटी ६ लाख १८ हजार रूपये खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले.
यावर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी देण्यात आलेल्या २२०० कोटी रूपये उदिष्टापैकी १ लाख ४३ हजार ७४५ शेतकर्यांना ७९८ कोटी ६ लाख १८ हजार रूपये पीककर्ज वाटप करण्यात आले. यात जिल्हा बँकेने ७४९ कोटी २९ लाख उद्दिष्टापैकी ५०० कोटी १० लाख रूपये कर्जवाटप केले आहे. मे अखेर ५० टक्के तर जून अखेर ८४ टक्के पीककर्ज वाटपात यावर्षी जिल्हा बँक आघाडीवर आहे.
– संतोष बिडवई (जिल्हा उपनिबंधक,सहकार)