आयुष्मानची कहाणी : छोटा पडदा ते बॉलिवूड एन्ट्री
मुंबई : पुढारी ऑनलाईन
आयुष्मान खुरानाचा आज बॉलिवूडमध्ये एक यशस्वी आणि टॅलेंटेड अभिनेत्याच्या यादीत समावेश केला जातो. तुम्हाला माहिती आहे का, त्याने आपल्या करिअरची सुरुवात कशी केली होती? विक्की डोनर, बधाई हो, दम लगा के हईशा, अंधाधुन यासारखे चाकोरीबाहेरचे चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आयुष्मान खुराना अनेक कलाकारांप्रमाणेच एक आऊटसायडर आहे. ज्याने करिअरची शुरुआत २०१२ मध्ये केली होती. त्याने शूजित सरकारचा चित्रपट विक्की डोनरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आयुष्मानचा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर त्याला अधिक लोकप्रियता मिळाली.
चित्रपटांसाठी केलं होतं स्ट्रगल
आयुष्मानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने चंदिगढमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो मुंबईत आला होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात थिएटरमधून केली होती. कॉलेजमध्ये ५ वर्षे थिएटर केलं होतं. २००१ पासून २००६ पर्यंत त्याने थिएटर केले. पुढे २००६ ते २००८ पर्यंत आयुष्मानने रेडिओमध्ये काम केलं. त्यानंतर २००८ ते २०१२ पर्यंत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये त्याने काम केलं. नंतर २०१२ मध्ये त्याचा पहिला चित्रपट रिलीज झाला होता.
आयुष्मानने सांगितले की, त्याचे वडील पी खुराना यांच्यामुळे तो मुंबईत आला होता. आयुष्मानला अभिनेता बनायचं होतं. परंतु, बॉडी बिल्ड करायची, घोडस्वारी शिकायची आणि फाईट वगैरे शिकायची, असा तो विचार करायचा. त्याला संपूर्ण तयारीने इंडस्ट्रीत यायचं होतं. परंतु, त्याच्या आई-वडिलांनी असं होऊ दिलं नाही.
वडिलांनी केलं होतं भविष्य
आयुष्मान सांगतो की, पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण होताच त्याच्या वडिलांनी त्याला म्हटले होते की, मुला जर तू आता गेला नाहीस तर मग पुढील दोन वर्षांपर्यंत तुला काम मिळणार नाही. आयुष्मानची परीक्षा संपताच पुढील दिवशी त्याला घरातून मुंबईसाठी रवाना करण्यात आले.
आयुष्मान म्हणाला, मुंबईत आल्यानंतर खूप अधिक स्ट्रगल असते. येथे राहण्यासाठी जागा नव्हती. तो आपल्या एका मित्राच्या हॉस्टलमध्ये बेकायदेशीरपणे राहत होता. त्याचा मित्र MBBS चे शिक्षण घेत होता आणि हॉस्टेलमध्ये राहायचा. आयुष्मान त्या मित्राच्या सहाय्याने त्याच्या खोलीत लपून छपून राहू लागला. पुढे जेव्हा काम मिळाले, तेव्हा त्याने आपल्या मित्राचे हॉस्टेल सोडले.
आयुष्मान खुरानाने २००४ मध्ये रोडीज सीजन २ मधून स्वत:ची ओळख बनवली. छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमधील एन्ट्रीने आयुष्मानसाठी नशीबाचे दरवाजे उघडले. २०१३ आणि २०१९ मध्ये आयुष्मानचे नाव फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० सेलिब्रिटींच्या यादीत होते. आयुष्मानने अभिनयाशिवाय सिंगिंगदेखील शिकले आहे. २०१८ मध्ये त्याला अंधाधुन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.