राज्यपालांनी घेतली 'मधुरा वेलणकर'ची दखल
मुंबई : पुढारी ऑनलाईन
लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णतः बंद असताना नवोदित लेखक, कवी मंडळींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अभिनेत्री मधुरा वेलणकर साटमने “मधुरव” हा उपक्रम सोशल मीडियावर सुरु केला होता.
युट्यूब आणि फेसबुकवर सुरु केलेल्या ‘मधुरव’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील देशातील अनेक वयोगटातील हौशी मंडळी जी लिखाणातून व्यक्त होतात. त्यांच्या लिखाणाचे वाचन करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं व त्यांचं कौतुक केलं. महाराष्ट्र ,गोवा, बेळगाव, हैद्राबाद, दिल्ली तसेच भारताबाहेर दुबई, अबुदाबी, मस्कत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथल्या मंडळींचा सहभाग यामध्ये होता.
‘आतिषबाजी’ हा दिवाळी ग्रंथ पुस्तक स्वरूपात तिने नुकतेच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, अभिनेता सुबोध भावे, सुमित राघवन अभिनेत्री मुक्ता बर्वे, डॉ. समीरा गुजर, राजू परुळेकर, मुग्धा गोडबोले यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. सोशल मीडियावर तयार झालेला हा ‘एकमेव’ ‘अद्वितीय’ दिवाळी ग्रंथ आहे.
लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा उत्तम वापर करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल थेट महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली आहे.