औरंगाबाद : कोरोनाच्या गोंधळामुळे वाघ्या-मुरळीचा झाला 'गोंधळ'
औरंगाबाद (हतनूर), प्रतिनिधी :
कोरोनाच्या भीतीने शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड आला खरा…पण या विवाहासारख्या शुभकार्यात जागरण – गोंधळाची परंपरा जोपासणार्या वाघ्या-मुरळी कलावंतांवर मात्र बिकट परिस्थिती आलीय..हातचं काम बंद झाल्याने खायचं काय?…अन् जगायचं कसं असा गहन प्रश्नच त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.
अधिक वाचा : १ ते १५ जूनपर्यंतच्या लॉकडाऊनवर आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!
कोरोनाने वाघ्या-मुरळी कलावंतांचा रोजगारच हिरावला…कोरोनामुळे लग्नसमारंभच रद्द झाल्याने हे लोककलावंत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विवाहानंतर कुलदेवतेचे स्मरण व्हावे, यासाठी जागरण-गोंधळ घातला जातो, यासाठी वाघ्या-मुरळी या लोककलावंतांना बोलवले जाते. जागरण- गोंधळातील हे कलावंत आपली कला सादर करतात. लग्नसराईत हे कलावंत खूप व्यस्त असतात. कारण वर्षभरातील मोजकेच दिवस त्यांच्याकडे रोजगार असतो.
अधिक वाचा : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस थेट शरद पवारांच्या भेटीला!
यंदा कोरोनाने विवाहसोहळे अनेकांनी पुढे ढकलले, तर काहींनी अवघ्या दहा ते पंधरा जणांच्या उपस्थितीत विवाह उरकले. यामुळे या कलांवतांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावात अशा कलावंतांचा गट आहे. मात्र कोरोनाने त्यांचा रोजगारच हिरावल्याने या कलावंतांवर आर्थिक संकट आले आहे, असे कलावंत रवींद्र शिंदे यांनी सांगितले. आर्थिक संकटात सापडलेल्या कलावंताना शासनाने मानधन द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.