ठाण्यात चोरट्यांनी मोबाईल खेचल्यामुळे महिलेचा रिक्षातून पडून मृत्यू
ठाणे : पुढारी वृत्तसेवा ; ठाण्यात चोरट्यांनी रिक्षात बसलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. मात्र चोरट्यास प्रतिकार करताना महिलेचा रिक्षातून तोल जाऊन ती खाली पडली. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नका परिसरात बुधवारी रात्री घडली.
अधिक वाचा : चेल्लम सरांनी दिली मुंबई पोलिसांना टीप
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे मात्र दुचाकीवरून फरार झाले होते. नौपाडा पोलिसानी फरारी झालेल्या चोरट्यांना अवघ्या काही वेळात बेड्या ठोकल्या. अल्केश परवेझ मोमीन अन्सारी (वय 20 वर्ष रा दर्गा रोड ,इंडिया हॉटेल समोर,कोषाल बिल्डिंग ,भिवंडी) आणि सोहेल रमजान अन्सारी (वय 18 रां क्वार्टर गेट मजसित जवळ ,जैतून पुरा भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक वाचा : नितीन गडकरींचे नाव सांगून सोनाराला गंडा
मुंबईच्या संताक्रूज येथे राहणाऱ्या कन्मिला रायसिंग (27) या ठाण्यातील एका मॉल मध्ये काम करतात. कन्मिला आणि त्यांची मैत्रीण बुधवारी रात्री आपले काम संपवून मॉलमधूल घरी निघाल्या होत्या. यावेळी दोघींनी कालिना येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्यांची रिक्षा तीन हात नाका जवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी दुचाकीच्या मागे बसलेल्या चोरट्याने धावत्या रिक्षातील कन्मिला हिच्या हातातील मोबाईल खेचला.
अधिक वाचा : वीकेंड लॉकडाऊन: कोल्हापुरात उद्या-परवा ‘हे’ राहणार सुरू
मोबाईल वाचविण्यासाठी कन्मिलाने प्रयत्न केला आणि याच प्रयत्नात रिक्षातून तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर महिलेला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नौपाडा पोलिसांनी विविध पथके बनवून तांत्रिक माहितीच्या आधारे दोघा चोरट्यांना अवघ्या काही तासात अटक केली. या घटनेनंतर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी अशा प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.