'धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने बोनस द्या'
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. येणाऱ्या सात दिवसांच्या आत धान उत्पादकांना बोनस न मिळाल्यास शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
अधिक वाचा : ‘ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार’
महाराष्ट्र शासनाद्वारे धान उत्पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यामध्येच त्यांच्या हक्काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुन महिन्याचा मध्य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेले नाही. त्याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्यात येतो. तो देखील अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे गरिब शेतकऱ्यांना खाजगी दुकानातून महागात बिजाई खरेदी करावी लागत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
अधिक वाचा : ओबीसींसाठी भाजपचे २६ जूनला राज्यभर चक्काजाम
ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्यात आले नसल्यामुळे गोरगरिब शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे. शासन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करुन त्यांच्यावरती अन्याय करीत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजपा हा अन्याय कदापीही सहन करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे बोनस तात्काळ न दिल्यास येत्या भारतीय जनता पार्टीद्वारे चंद्रपूर जिल्हयात तिव्र आंदोलन करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यात येईल असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.