या महिन्यात माझी आवडती जिन्स आणि टॉप मी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे कपडे मला बसलेच नाहीत. कारण होतं...कमरेचा वाढलेला घेर. मग, हा कमरेचा घेर वाढला कसा? खूप सारं खाल्ल्याने पोटाबरोबर कमरेचा आकारदेखील वाढलाय का? की ८-८, ९-९ तास एका जागी बसून काम केल्याने झालं असेल? की वेळेवर खाल्लचं नाही म्हणून...कधी-कधी उपाशीच झोपले, यामुळे झालं असेल का? असे सर्व प्रश्न तुमच्याही मनात घोळत असणार. मग, आता काय करावं, कसं कमी करायचं सुटलेलं पोट, वाढलेला कमरेचा घेर?
वाढलेलं वजन प्रत्येकाची समस्या बनली आहे. धकाधकीच्या जीवनात अवेळी खाणे, फास्ट फूड खाणे, घरातले जेवण नाकारणे, व्यायाम न करणे, ताणतणावामुळे आपण बेढब होत जातो. मग, इतकं सारं खाल्लेलं जेवण, पदार्थ कुठे जातात. ते पचत नाहीत का? फास्ट फूडमुळे खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? या गोष्टी आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही कसं आणि किती वेळा खाता हे महत्त्वाचं आहे.
पोट आणि कमरेचा घेर कशामुळे वाढतो?
अपुरी झोप, अवेळी खाणे, बाहेरचे खाणे, व्यायाम नसणे, खूप तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यानेदेखील बॅड फॅट वाढायला सुरुवात होते. चांगल्या आरोग्यासाठी शरिरातील चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. सलग एक - दोन तास एका जागी बसणे टाळावे. दिवसातून किमान एकदा तरी व्यायाम करावा. शक्य असल्यास दोरीच्या उड्या मारणे.
- ऑफिसमध्ये काम करत असाल तर मध्ये मध्ये उठून चालावे.
- सकाळी उठून चालायला जावे.
- घरच्या घरीदेखील किमान १ तास व्यायाम करावा.
- दिवसभरात भरपूर पाणी प्यावे
- भूक लागल्यानंतर प्रसन्न मनाने खावे.
- नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
- सकाळी पोटभर नाष्ता खाणे
- दुपारचे जेवण वेळेवर घेणे
- रात्री लवकर जेवणे, लवकर झोपणे
- दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने खाणे
काय खावं?
सकाळी पोटभर खावं, असं म्हणतात, ब्रेकफास्ट कधी चुकवू नये. कामाला जाणाऱ्या लोकांनी आणि गृहिणींनीदेखील ब्रेकफास्ट करायलाच हवे.
अंडी -अंडी खात असाल तर सकाळी दोन अंडी खायला हरकत नाही. यातून प्रथिने भरपूर मिऴतात.
दूध - एक ग्लास दूध पिणेदेखील आरोग्यास फायदेशीर ठरते. बदाम दूध पिल्यास तरीही चालेल. बदाम, अक्रोड असा सुका मेवा खावा.
ग्रीन टी - सकाळी ग्रीन टी प्यायला हरकत नाही. किंवा विनादुधाचा चहा घेणे फायदेशीर ठरेल.
घरात बनवलेला नाष्ता - घरात बनवलेली खीर, उपीट, पोहे, आंबवलेल्या पदार्थापासून बनवलेले पदार्थ-इडली, डोसा, अप्पे वगैरे. तसेच मुगाची खिचडी खावी.
सॅलेड - दुपारच्या जेवणात गाजर, बीट, काकडी, कांदा खावा. कच्चा कोबी, हिरवे मटर, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर यांचे मिश्रण करून कोशिंबीर खाल्ली तरी चालेल.
फळे - पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी विविध फळे खायला हवेत. बेरीज्, सफरचंद, चेरी, पेर, पपई, डाळिंब यासारखे फळे देखील लाभदायक आहेत. दरम्यान वजन घटवण्यासाठी फळांचे सेवन करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते, यासाठी लोक आपल्या जेवणात फळांचा समावेश करतात.
हिरव्या पालेभाज्या - हिरव्या भाज्यांचा आहार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक मानला जातो. यासाठी आपल्या जेवणात अधिक प्रमाणात भाज्यांचा समावेश करावा. फळभाज्या, ब्रोकली, कोबी यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.
तूप - गायीच्या दुधाच्या तुपाचा वापर आहारात केल्यास अतिउत्तम आहे. तूप तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. यात चांगले फॅटी अॲसिड, ओमेगा-६ असतात. हे आपल्या शरिरातील चरबीचा स्तर कमी करण्यास मदत करते. परंतु, तूपदेखील प्रमाणात खाणे आवश्यक आहे. कारण काही गोष्टी जरी जास्त प्रमाणात वापरल्या गेल्या तरी त्या हानिकारक असतात.
काय टाळावं -
तळलेले पदार्थ टाळावेत - समोसे, फरसाण, पुऱ्या, शेव, पापडी, तळलेले पापड, तळलेले वेफर्स टाळावेत.
फास्ट फूड टाळणे - पाणीपुरी, रगडा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, अन्य फास्ट फूड खाणे टाळावे. त्याऐवजी फळे, शेंगदाणे, सुका मेवा, हरभरा खावा. फळांचा ज्यूस पिणेही उत्तम ठरते.
आपलं वजन आटोक्यात राहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसेच नियमित व्यायाम, योग्य आहार आणि प्रसन्न मन हीच आपल्या आरोग्याची गुरूकिल्ली आहे.
संकलन : स्वालिया शिकलगार, पुढारी ऑनलाईन