परळी वैजनाथ (जि. बीड) : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. या संचारबंदीचे पालन करण्यासाठी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर लोकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथे घडली.
संचारबंदी दरम्यान लोकांना घरात बसण्याचे आवाहन सातत्याने पोलिस करत आहेत. बऱ्याच ठिकाणी पोलिस आपल्या बळाचा वापर देखील करत आहेत. सिरसाळा येथील वडार वस्ती येथे गस्ती दरम्यान पोलिसांना काही नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर जमल्याचे दिसले.
पोलिसांनी त्यांना संचारबंदी चालू असल्याने घरात जाण्याचे सांगितले. तेव्हा नागरिकांनी 'आमच्या गल्लीत येऊन सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे' असे म्हणत तेथील तरूणांनी लाकूड, दगडाने पोलिस नाईक किशोर घटमल यांना मारहाण केली.
पोलिसांनी देखील रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. महिलाना देखील रक्त निघेपर्यंत मारहाण केल्याचे दिसत आहे. एक विवाहित तरूणीही यात जखमी झाली आहे. ती पोलिस व्यक्तिगत वैर काढत असल्याचा आरोप करत आहे. त्यांच्या तक्रारीवरून राम तुकाराम पवार, श्रीराम पवार, दत्ता देवकर, अशोक पवार, विकास मिटकर, विलास मिटकर, सोनाली पवार, अनिल जाधव यांच्याविरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(ब) आणि भादंवि.च्या विविध कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक जनक पुरी करत आहेत.