पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात तणाव आणि संघर्षाची परिस्थिती असताना क्वाड शिखर परिषद होत आहे. अशावेळी क्वाड देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणे संपूर्ण मानवतेसाठी खूप हिताचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. २२) अमेरिकेत चौथ्या क्वाड शिखर परिषदेत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'क्वाड' देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या बैठकीसाठी अमेरिकेत आहेत. शनिवारी २१ सप्टेंबर रोजी चौथ्या क्वाड शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. विल्मिंग्टन, डेलावेअर येथे झालेल्या या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सहभागी झाले. बैठकीत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये रशिया- युक्रेन युद्धापासून इस्रायल-हमास संघर्षापर्यंत विविध गोष्टींवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, शिखर परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा जग तणाव आणि संघर्षाने वेढलेले आहे. अशा स्थितीत सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारे एकत्रितपणे कार्य करणे क्वाडसाठी संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आम्ही सर्व नियम-आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि सर्व समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणाचे समर्थन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
क्वाड देशांनी आरोग्य, सुरक्षा, गंभीर उदयोन्मुख तंत्रज्ञान, हवामान बदल आणि क्षमता निर्माण यांसारख्या क्षेत्रात अनेक सकारात्मक आणि सर्वसमावेशक पुढाकार घेतला आहे. आमचा स्पष्ट संदेश आहे, क्वाड येथे राहण्यासाठी, मदत करण्यासाठी, भागीदार करण्यासाठी आणि पूरक होण्यासाठी आहे, असेही मोदी म्हणाले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या परिषदेसाठी अभिनंदन केले. तसेच २०२५ मध्ये भारतात क्वाड बैठक आयोजित करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
इंडो-पॅसिफिक तसेच दक्षिण-पूर्व आशियातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी क्वाड फेलोशिपसह क्वाड समिट दरम्यानच्या आव्हानांबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. यावेळी बायडेन म्हणाले की, आपण लोकशाही देशांना कसे काम करावे हे माहीत आहे. म्हणूनच मी माझ्या अध्यक्षपदाच्या पहिल्या दिवसात प्रत्येक राष्ट्राशी संपर्क साधला की आम्ही क्वाडला अधिक उत्पादनक्षम बनवू. चार वर्षांनंतर, चार देश पूर्वीपेक्षा अधिक सामरिकदृष्ट्या एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले.