पुढारी ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi Wayanad Visit) आज शनिवारी (दि.१०) वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन होते. त्यानंतर पीएम मोदी वायनाडच्या कल्पेट्टा येथे दाखल झाले. पीएम मोदी शनिवारी सकाळी ११ वाजता कन्नौरमध्ये दाखल झाले. तेथून ते भारतीय हवाई दलाच्या (IAF) हेलिकॉप्टरने केरळच्या वायनाड जिल्ह्याकडे रवाना झाले.
पीएम मोदींनी भूस्खलनग्रस्त चूरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमत्तम गावांची हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी होते.
पीएम मोदींनी हवाई पाहणी केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागांची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यांनी येथील बचाव कार्याची माहिती घेतली.
३० जुलै रोजी वायनाडच्या चूरलमाला आणि मुंडक्काईला येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अद्याप १३१ जण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला वायनाडमधील भूस्खलन राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. (Wayanad landslides)
संसदेच्या अधिवेशनातही वायनाडमधील भूस्खलनाचा मुद्दा चर्चेला आला होता. दरम्यान, काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही यापूर्वी वायनाडचा दौरा करुन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.