पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकांमध्ये पाकिस्तानातून जम्मू काश्मीरमध्ये स्थलांतरित झालेले हिंदू पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. १९४७ ला भारत पाकिस्तान फाळणीनंतर जम्मू काश्मीरमधील ५ हजारांहून अधिक निर्वासित कुटुंबे प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, १९४७ ला भारत-पाकिस्तान फाळणी झाली. त्यानंतर या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. या घटनेनंतर पाकिस्तानातून भारतात स्थलांतर झालेली 5,000 हून अधिक हिंदू कुटुंबे सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करतील, अशी माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिल्याने कलम 370 लादण्यात आले. या कायद्यामुळे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित कुटुंबांना येथे जमीन आणि इतर हक्क नाकारण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू निर्वासित कुटुंबांना सात दशकांहून अधिक काळ जम्मूजवळील ३९ निकृष्ट छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने येथील हिंदू निर्वासितांना 1 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकांमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळणार आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट २०२९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. त्यानंतर येथील पाकिस्तानमधील हिंदू निर्वासितांना मताधिकार मिळाला. अनेक दशकांच्या राजकीय दुर्लक्षानंतर या निर्वासितांना कायमस्वरूपी रहिवासी दर्जा देण्याचा मार्ग देखील केंद्राच्या निर्णयामुळे मोकळा झाला. दरम्यान जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये त्यांचे वर्चस्व वाढावे यासाठी हिंदू निर्वासितांना दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर केंद्रशासन दोन सदस्यांना नामनिर्देशित करेल, हे जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी हिंदू निर्वासितांसाठी मोठे पाऊल असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
"जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकीचा दिवस आमच्यासाठी एक सण असेल", असे मत पश्चिम पाकिस्तान निर्वासित कृती समितीचे अध्यक्ष लाभू राम यांनी व्यक्त केले आहे. या ऐतिहासिक संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबे पुरी हलवा आणि लाडू असे पदार्थ बनवून साजरा करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.