पुढारी ऑनलाईन डेस्क : आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांनी आज (दि.२३) दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. यावेळी आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवली. याच खुर्चीच्या बाजूला दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना आतिशी म्हणाल्या की, "आज माझी मनस्थिती रामायणातील भरतासारखी आहे. प्रभू राम यांचा वनवास सुरु असताना भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून १४ वर्षे राज्य केलं. तशाचप्रकारे पुढील चार महिने मी दिल्लीचे सरकार चालवणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी सन्मान आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिला आहे."
गेल्या दोन वर्षांपासून भाजपने अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांच्यावर खोटे खटले दाखल करण्यात आले. त्यांना अटक करून सहा महिने तुरुंगात टाकले. जोपर्यंत दिल्लीतील जनता त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हणत राजीनामा दिल्याचेही आतिशी यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे. मला आशा आहे की, दिल्लीची जनता त्यांना पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून देईल. तोपर्यंत त्यांची खुर्ची या कार्यालयातच राहील, असेही आतिशी यांनी म्हटलं आहे.