controversial issues : बाॅलिवुडमधील दिग्गज मोदी सरकारवर संतप्त; विविध स्तरांतून टीकेची झोड | पुढारी

controversial issues : बाॅलिवुडमधील दिग्गज मोदी सरकारवर संतप्त; विविध स्तरांतून टीकेची झोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरिद्वार येथे पार पडलेली धर्मसंसद आणि त्यामध्ये विशिष्‍ट समुदायासंदर्भात केलेली वादग्रस्त वक्तव्य, त्याचबरोबर बुली बाई व सुल्ली डिल्स नावाच्या अ‍ॅप्सवरून मुस्लीम महिलांचा लिलाव होत असणारा प्रकार, तसेच नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी चीनने गलवान खोऱ्यात फडकवलेला झेंडा, या वादग्रस्‍त मुद्द्यांवरून ( controversial issues )मोदी सरकारवर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून टीकेची झोड उठवली जात आहेत. यामध्ये बाॅलिवुडमधील काही ज्येष्ठ गायक, अभिनेते आणि संगीतकार यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

controversial issues : जावेद अख्तर म्हणतात, “अशा मुर्खांना तुम्ही काय म्हणाल?”

“ज्या क्षणी मी महिलांच्या ऑनलाईन लिलाव प्रकरणावर भूमिका मांडली, (नथुराम) गोडसेचा उदोउदो करणाऱ्यांना विरोध केला, एका विशिष्ट धर्माविरोधात नरसंहाराची शिकवण देणाऱ्यांविरोधात मत व्यक्त केलं. त्या क्षणी काही धर्मांध व्यक्तींनी माझ्या खापर पणजोबांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. ते स्वातंत्र्यसेनानी होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना १८६४ मध्ये त्यांचं निधन झालं. अशा (ट्रोलर्स) मूर्खांना तुम्ही काय म्हणाल?”, असा प्रश्न जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये असंही म्हटलं आहे की, “एकीकडे शेकडो महिलांचा ऑनलाईन लिलाव सुरू आहे, दुसरीकडे तथाकथिक धर्मसंसद भरतेय. जिथे लष्कर, पोलीस आणि लोकांना देशातील अल्पसंख्याक लोकांची हत्या करण्यास सांगितलं जातंय. या सर्व प्रकरणांवर माझ्यासकट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सर्वांच्या मौनाची भीती वाटतेय. हाच का…सब का साथ?”, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

विशाल ददलानी म्हणतात, “५६ इंचाची छाती चीनी बनावटीची निघाली का?”

१ जानेवारी २०२२ या नव्या वर्षी आणि नव्या दिवशी चीनने गलवान खोऱ्यात झेंडा फडकवला आणि त्यावर सोशल मीडियावरून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. याच मुद्द्यावर प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी ट्विट करून म्हंटलं की, “नमस्कार नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, लाल डोळे राहू द्या, एकदा हेच बोलून दाखवा की, चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला. शौर्याच्या गप्पा करणारे आता गप्प का? चीनच्या दोन-चार ऍपवर बंदी घालणार नाही का? ५६ इंचाची छाती चिनी माल निघाली का?”, असा खोचक सवाल ददलानींनी मोदी सरकारला विचारला आहे.

नसीरुद्दीन शहा म्हणतात, “२० कोटी लोकसंख्या लढण्यास तयार आहे”

धर्मसंसदेतील वादग्रस्त वादग्रस्त विधानांनंतर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह म्हणतात की, “जे लोक मुस्लिमांच्या नरसंहाराचं आवाहन करत आहेत ते लोक खरं तर देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत. सध्या जे काही सुरू आहे ते पाहून धक्का बसतो. वादग्रस्त विधानं करणारे नक्की काय बोलत आहेत याचा त्यांना अंदाजही नसावा. ते लोक ज्या प्रकारचं आवाहन करत आहे ते एखाद्या गृहयुद्धाप्रमाणे आहे.”

“२० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं विधान करू शकत नाही. मुस्लीम अशा विधानांविरोधात लढण्यास तयार आहेत. कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढापिढ्या येथेच राहिल्यात आणि येथेच मरण पावल्यात. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी विधानं करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल”, असंही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर, प्रसिद्ध गायक विशाल ददलानी आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देशात सुरू असलेल्या धार्मिक वादांवर संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून देशातील मुळच्या प्रश्नांनी जाणीवपूर्वक बगल दिली जात आहे, असंही सोशल मीडिया युजर्स आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणताहेत. महिला वर्गही मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button