परमबीर सिंग यांच्याविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात तत्कालीन ठाकरे सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्या विरोधातील सर्व आरोपांची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे तत्कालीन ठाकरे सरकारने सीबीआय चौकशीला विरोध करीत हा तपास पोलिसांकडेच राहू द्यावा, असे म्हटले होते.
राज्य सरकारच्या याचिकेवर विचार करण्यासारखे कारण दिसून येत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी सुनावणीदरम्यान केली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेच काही महिन्यांपूर्वी परमबीर सिंग यांच्या विरोधातील चौकशी सीबीआयकडे सुपूर्द केली होती. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत कोरडे ओढले होते.