नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मी आणि अॅड. प्रकाश आंबेडकर सोबत आलो, तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही बदल होऊ शकतात. मी एकटा असल्याने दलितांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळत नाही. आम्ही दोघे एकत्रित आलो, तर ते नक्कीच होऊ शकेल. माझे मंत्रिपदही मी सोडू शकतो. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत आले पाहिजे. मी काही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार नाही. ते एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला.
मारवाडी फाऊंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त आठवले नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
आठवले म्हणाले की, देशात संविधान कोणी बदलवू शकत नाही आणि आरक्षण कोणी हटवू शकत नाही. मात्र, राहुल गांधी आरक्षण हटवू शकतात. ते विदेशात जाऊन भारताची बदनामी करतात. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त केला पाहिजे किंवा त्यांच्याकडून देशाच्या विरोधात वक्तव्य करणार नाही, असे लिहून घेतले पाहिजे.
राहुल गांधी समजदार नेते आहेत, मात्र देशाच्या बाहेर जाऊन आरक्षण बंद करण्याची भाषा करणे हे योग्य नाही. राहुल गांधींच्या विरोधात देशभर निषेध, आंदोलने झाली. मात्र, त्यांची जीभ छाटली पाहिजे किंवा जिभेला चटके दिले पाहिजे, असे वक्तव्य करणे योग्य नाही, आम्ही त्याचे समर्थन करत नाही, असेही आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधी पक्षाने संविधान बदलणार म्हणून खोटा प्रचार केला. त्याचा परिणाम म्हणून आमच्या जागा कमी झाल्या. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत असे काही होणार नाही. मोदी यांनी संविधानावर डोके टेकवून शपथ घेतली आहे. लंडनचे घर असो की इंदु मिलच्या जागेवर स्मारकाचे काम असो, त्यात नरेंद्र मोदींचे मोठे योगदान आहे. मोदी कधीही संविधान बदलणार नाहीत.
आगामी विधासभा निवडणुकीत रिपाइंने ( आठवले गट) १० ते १२ जागांची मागणी केली असून चर्चेत कमी जास्त होऊ शकतात. मात्र, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आम्ही लढणार आहे. देवेंद्र फडणवीस समजुतदार आहेत, त्यामुळे ते लक्ष देतील, असेही आठवले म्हणाले.