नागपूर : आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गँरटी नाही, मात्र रामदास आठवले यांना मंत्री होण्याची गँरंटी आहे, असे सांगत सरकार कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावताच पुरस्कार प्रदान कार्यक्रमात एकच हशा पिकला.
मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, रामदास आठवले राजकीय हवामानाचा अचूक अंदाज घेतात. त्यांना आतापर्यंत तीनवेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा आमचे सरकार आल्यावर मंत्री होणारच असल्याचे वक्तव्य केले. त्यावर गडकरी म्हणाले, रामदास आठवले यांनी दलित पँथर संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात चळवळ शक्तीशाली बनविण्याचे काम केले. आता पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला नाही, पण राज्य कुणाचेही आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे, असे गडकरी यांनी सांगितले. गेल्या मंत्रीमंडळात आठवले केंद्रात मंत्री असताना लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान म्हणाले होते की, रामदास आठवले हे राजकीय हवामान शास्त्रज्ञ आहेत. राजकारणात पुढे काय होणार आहे याची सर्व माहिती आठवलेंना असते, असा किस्सा गडकरी यांनी सांगितला.
आठवले यांनी दलित, शोषित समाजाला न्याय देण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील स्मारक, मुंबईच्या इंदू मिलच्या जागेत साकार होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, या प्रकल्पांसाठी रामदास आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. हे कार्य मोठे आहे, असे देखील गडकरी यांनी नमूद केले.