गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने ९ भरारी पथक तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे.
या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत शुक्रवार (दि. २०) जिल्ह्यातील ९९ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये ८ कृषी केंद्रांचे परवाने २ महिन्यांकरीता निलंबित करण्यात आले असतानाच ९१ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहे.
कृषि विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषि केंद्राची तपासणी केली. यावेळी ८ कृषि केंद्राचे विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषि निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी प्रकार दिसून आले.
कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा कृषी केंद्रांना दिला आहे.