अमरावती : वयोवृद्ध आईसह मुलाने शहरालगतच्या छत्री तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी उघडकीस आली. कौटुंबिक वादातून माय-लेकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. लक्ष्मी उत्तमराव लोणारकर (वय ८०, रा.दस्तूर नगर) व लक्ष्मणराव उत्तमराव लोणारकर (वय ५४, रा. दस्तूर नगर) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, आज (रविवारी) छत्री तलाव परिसरात नागरिक फिरायला आले असता त्यांना तलावात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यामुळे याबाबत लगेच त्यांनी राजापेठ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर राजापेठचे ठाणेदार आपल्या पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जिल्हा शोध व बचाव पथकाला माहिती देऊन त्यांना या ठिकाणी पाचारण केले. काही वेळानंतर लक्ष्मी लोणारकर यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. लक्ष्मी या दस्तुरनगर परिसरात आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. यानंतर दुपारी एकच्या दरम्यान दुसरा मृतदेह आढळून आला. मृताचे नाव लक्ष्मणराव लोणारकर असून बुडालेले हे दोघं माय-लेकं असल्याची माहिती समोर आली.
लक्ष्मणराव लोणारकर हे अमरावती विद्यापीठामध्ये परीक्षा विभागात सीनियर क्लार्क या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि १७ वर्षांचा मुलगा आहे.घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल त्यांनी उचलल्याचे परिसरात बोलले जात आहे. वयोवृद्ध आईसह मुलाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचेही मृतदेह जिल्हा शोध व बचाव पथकाने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.