खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीचे छापे
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ – वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे.
गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
- जळगावात सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; अल्पवयीन मुलगा ताब्यात
- अवनी लेखारा : संकटाशी झुंजत ‘सुवर्ण’ला गवसणी घालणारी मुलगी
यानंतर आज मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
ईडीला संपूर्ण सहकार्य, माध्यमांशी नंतर बोलणार : भावना गवळी
या प्रकरणी खासदार भावना गवळींशी संपर्क साधला असताना त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ईडीचे अधिकारी तपास करत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असून त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. त्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण यावर भाष्य करू, असं गवळींनी सांगितलं.
- MNS : मनसेच्या दहीहंडीला पोलिसांचा मज्जाव; मनसेचे आंदोलन
- लाज शरम सगळंच विसरली; प्रियांका चोप्रा हिच्या ‘त्या’ फोटोवर युजर्स संतापले
खासदार भावना गवळी यांच्याकडून संस्थांच्या माध्यमातून लूटमार सुरू आहे. शिवसेना नेत्यांची माफियागिरी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली. त्यांनी गवळी यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचं स्वागत केलं. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
सत्ताधारी पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आरोप आधी भाजपकडून केले जायचे. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. मात्र आता भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडूनही तेच सुरू आहे. ईडीच्या नोटिसा अनेकांना जातात. धाडी पडतात. मात्र त्यांचं पुढे काय होतं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.