वर्धा : १८५ गुन्ह्यांत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व मद्य विक्रीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईत १८५ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ९२ गुन्ह्यामध्ये ९१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ६ वाहन जप्त करण्यात आले असून आरोपींकडून ४० लाख ८५ हजार २४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एक निरिक्षक, तीन दुय्यम निरीक्षक, एक सहाय्यक दुय्यम निरिक्षक, सहा जवान व एक वाहन चालक असा तोकडा कर्मचारी वर्ग असतांनाही विभागाच्यावतीने सदर अवैद्य मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणार्या विरुध्द कारवाई करण्यात आली. नागरिकांनी त्यांच्या परिसरात होत असलेल्या अवैध भेसळयुक्त व बनावट दारु विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३३९९९९ टोल फ्री व ८४२२००११३३ या राज्यस्तरीय व्हॉट्स अॅप क्रमांकावर किंवा ०७१५२-२४०१६३ या जिल्हास्तरीय अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.