Devendra Bhuyar : बडव्यांमुळेच “मातोश्री’ बदनाम ; अपक्ष आमदार भुयार | पुढारी

Devendra Bhuyar : बडव्यांमुळेच "मातोश्री' बदनाम ; अपक्ष आमदार भुयार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा: लवकरच महाविकास आघाडी सरकारवरचे संकट दूर होईल आणि सरकार वाचेल. बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसात परत येतील, असा विश्‍वास मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेन्द्र भुयार यांनी व्यक्त केला आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे. पण त्याच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरले आहे. या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे, अशी टीका मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी बंडखोर नेत्यांवर केली.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना भुयार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभोवतालचे वातावरण आणि माणसे लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे.  मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही, असे कारण सांगत हे बडवे उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करत आहेत. यांच्या नादी लागूनच राज्यातील आमदार नाराज होऊन गेले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांनाच माहित आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नसल्याचा आरोपही भुयार यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या सूचनेनुसारच, ते तातडीने मुंबईला रवाना झाले झाले आहेत. मुंबईला जाण्यासाठी भुयार विमानतळावर आले असता, माध्यमांशी ते बोलत होते. देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक अपक्ष आमदार आहेत. त्यांनी उल्लेख केलेला बडवे नेमके कोण हे मात्र देवेंद्र भुयारांनी स्पष्ट केले नाही.

हेही वाचा :

 

 

Back to top button