ठाणे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास त्यांच्या मिसिंगची तक्रार ही अपहरण म्हणूनच दाखल करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे अपहरणाच्या दाखल गुन्ह्यातील आकडेवारीत वाढ होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पार्श्वभूमीवर बर्याच वर्षांपासून शोध न लागलेल्या मिसिंग मुलांची शोध मोहीम ठाणे गुन्हे शाखेने हाती घेतली आहे. गुन्हे
शाखेच्या मानवीय तस्करी प्रतिबंधक पथक, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट व इतर पथकांमार्फत गेल्या आठ महिन्यांत हरवलेल्या 77 मुलांचा शोध घेतला.
ठाणे पोलिसांनी गेल्या अनेक वर्षांपासून हरवलेले व अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलांची फाईल रिओपन करीत त्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या गेल्या आठ महिन्यांत तीन व त्याहून अधिक वर्ष शोध न लागलेल्या 77 अल्पवयीन मुलांचा
शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेने बजावली आहे.
दरम्यान, अपहरणांच्या दाखल एकूण गुन्ह्यात 75 टक्के गुन्हे हे लहान मुलांच्या अपहरणाचे आहेत. लहान मुलांचे अपहरण
करून त्यांना भिक मागण्याच्या कामाला लावणार्या अनेक टोळ्या मुंबई ठाणे परिसरात कार्यरत असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे. ह्या टोळ्या आपल्या हस्तकांमार्फत लहान मुलांचे अपहरण करतात. तर खंडणीसाठी देखील मोठ्या प्रमाणात अपहरण करण्याच्या
घटना घडत असल्याचे दिसून येते.