

भिवंडी: शहरातील नागाव गायत्री नगर येथील वन विभागाच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वसलेली आहे.त्याठिकाणी पालिका प्रशासनाने शनिवारी अचानक कारवाई करण्यास सुरवात केल्या नंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून प्रखर विरोध केला आहे.
24 जून रोजी येथील डोंगरावरील माती खचल्याने सात झोपड्या जमीनदोस्त झाल्या होत्या.त्यानंतर पालिकेने या भागातील झोपड्यां वर कारवाई करण्याचा निर्णय घेत शनिवारी या ठिकाणी वन विभागा सह पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यास सुरवात केली होती.
सुरवातीला पालिकेने स्थानिक घरांचे वीज व नळ कनेक्शन खंडित करीत येथील घरांचा विद्युत पुरवठा बंद करीत सुमारे 150 हून अधिक वीज मीटर काढून जप्त केले. तर अनेक नळ तोडून कारवाईस सुरुवात केली.त्यानंतर स्थानिक माजी नगरसेवक विकास निकम व शरद धुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याने येथील परिस्थिती शांत झाली. ऐन पावसाळ्यात ही कारवाई अयोग्य असून,जेथे दरड कोसळल्याने झोपड्यांचे नुकसान झाले तेथील झोपड्या हटवण्यास आमचा विरोध नाही पण सरसकट सर्व घरांवर होणारी कारवाई अयोग्य आहे.