कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे ४८ रुग्ण
डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्लूचे ४८ रुग्ण आढळून आले. त्यापैकी २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २४ रुग्ण स्वाईन फ्लूशी दोन हात करत सुखरूप घरी परतले आहेत. दरम्यान दोन जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत महापालिकेकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून लोकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास विलागिकरण करावे, गर्दीत जाऊ नये तसेच मास्कचा वापर करावा व ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.
स्वाईन फ्लूचे लसीकरण सुरू ….
महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय आणि वसंत व्हॅली येथे स्वाईन फ्लूचे लसीकरण केंद्र महापालिकेतर्फे चालू करण्यात आली आहेत. ही लस दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती व फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल, उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आरोग्य कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्वाईन फ्लूची लस दरवर्षी घेणे आवश्यक…
ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लुएंन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. यामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत टिकू शकते त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते. कोरोना आणि स्वाईन फ्लूची लस एकत्र घेऊ नये. स्वाईन फ्लूची लस घेतल्यानंतर कोरोनाची लस दोन आठवड्यांनी घ्यावी, अशी माहिती डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.