

दक्षिण सोलापूर : नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत फताटेवाडी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनर्वसनमंत्र्यांकडुन दिलासादायक निर्णय देण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील औष्णिक उर्जा प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोजगार, भरपाई, पुनर्वसन आणि स्थानिक विकासाशी संबंधित मुद्दे मांडण्यात आले. त्यावर सविस्तर चर्चा करून मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळणार असून, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, प्रकल्प प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संवाद वाढवून समस्यांचे निराकरण गतीमान करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
ही बैठक अत्यंत सकारात्मक आणि फलदायी वातावरणात पार पडली असून, प्रशासन आणि प्रकल्पग्रस्तांमधील समन्वयासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.