मोहोळ : येत्या पंधरा दिवसात शेतीच्या वीजबिल माफीचा आदेश काढण्यात येणार असून पुढील पाच वर्ष शेतीला मोफत वीज देण्यात येणार आहे. साडेनऊ हजार मेगावॅट विजेची निमिर्ती सौरऊर्जेवर केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.२२) मोहोळ येथील सभेत दिली. मोहोळ येथील बाजार समितीच्या मैदानावर रविवारी (दि.२२) ' जनसंवाद यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, सिना-भोगावती जोडकालव्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी पावणेतीन हजार कोटींचा निधी देण्यात आला असून मोहोळकरांना निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगत यशवंत माने हे येत्या विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
मोहोळ आणि बारामती फार लांब नाही. आणि मला दोन्ही सारखेच आहे. आम्ही जरी महायुतीबरोबर असलो तरी, आम्ही सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही. राणे यांचे नाव न घेता महाराष्ट्रात काही लोक जातीवादी वक्तव्य करत आहेत. त्याचं समर्थन राष्ट्रवादी कधीच करत नाही. माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात येतो मात्र आम्ही वडीलधाऱ्यांचा आदरच करतो, असेही पवार यावेळी म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, लोकनेतेचे अध्यक्ष विक्रांत पाटील , कल्याणराव काळे , किसन जाधव,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,उपाध्यक्ष हेमंत गरड, वैभव गुंड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, कार्याध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, प्रमोद डोके, रामदास चवरे,राजाभाऊ गुंड, सतिश भोसले, मदन पाटील, शरद पाटील, सचिन बाबर, मुजिब मुजावर, प्रशांत बचुटे यांच्यासह अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.